Did you like the article?

Showing posts with label Bigul. Show all posts
Showing posts with label Bigul. Show all posts

Tuesday, June 5, 2018

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे व्यासपीठ


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे व्यासपीठ
बुधवार, ६ जून, २०१८कामिल पारखे
ज्येष्ठ काँग्रेस नेते प्रणव मुखर्जी यांनी रास्व संघाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारल्याचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. यानिमित्ताने संघाने आत्तापर्यंत भिन्नविचारी समूहांशी ठेवलेल्या संबंधांवर दृष्टिक्षेप.
आणीबाणीपर्वानंतरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा आपल्या स्वनिर्मित कोषातून बाहेर आला आणि इतर, भिन्न विचारी राजकीय पक्ष आणि  संघटनांच्या मांडीस मांड लावून बसायला लागला.  त्याआधी उजव्या विचारसरणीच्या संघाच्या आणि पुरोगामी, डाव्या आणि समाजवादी विचारसरणींच्या मधून विस्तव जात नव्हता. आणीबाणीच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर, आनंदमार्ग, जमाते इस्लामी वगैरे संघटनांवर बंदी घालण्यात आली होती. संघाच्या देशातील हजारो कार्यकर्त्यांना आणीबाणीत तुरुंगात डांबण्यात आले होते. तत्कालीन  सरसंघचालक बाळासाहेब देवरस त्यावेळी येरवडा तुरुंगात होते. तेथेच विविध विरोधी राजकीय नेत्यांनाही ठेवण्यात आले होते. महाराष्ट्रात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांनी आणीबाणीला समर्थन दिले होते. ते दोघे वगळता महाराष्ट्रातील इतर सर्व प्रमुख विरोधी राजकीय पक्षांच्या नेत्यांना आणीबाणीत अटक झाली होती. आणीबाणीनंतर संघाचे  पुरोगामी वर्तुळात असलेले अस्पृश्यत्व काही काळ संपले, याचे कारण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आणि जनसंघाचे नेते यांची आणि इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांची या काळात तुरुंगात झालेली उठबस आणि वैचारिक देवाणघेवाण. 
त्यामुळेच  पंतप्रधान  इंदिरा गांधी यांनीं १९७७ च्या जानेवारीत आणीबाणी  शिथिल करून निवडणुका जाहीर केल्या आणि राजकीय विरोधकांची तुरुंगातून सुटका केली त्याबरोबर सर्व बिगरकाँग्रेस पक्षांची मोट बांधून निवडणुका लढवण्याचे प्रयत्न सुरू झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा या प्रयत्नांस पूर्ण पाठिंबा होता. अशाप्रकारे जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली मोरारजी देसाई यांची संघटना काँग्रेस; जॉर्ज फर्नांडिस, मधू  दंडवते, मधू लिमये, मृणाल गोरे, एस एम जोशी, ना. ग. गोरे  वगैरेंचा  समाजवादी पक्ष; चौधरी चरण सिंग यांचा भारतीय लोक दल; ओडिशाचे बिजू पटनाईक आणि काँग्रेसमधून बंडाचा झेंडा उभारणारे चंद्रशेखर; मोहन धारिया आणि जनसंघाचे अटल बिहारी वाजपेयी, लाल कृष्ण अडवाणी वगैरेंची एकजूट झाली. चरण सिंगांच्या भारतीय लोक दलाच्या नांगरधारी शेतकरी या निवडणूक चिन्हावर निवडणुका लढवून हे नेते केंद्रात सत्तेवर आले आणि त्यानंतरच अधिकृतरीत्या चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाची स्थापना झाली.  
मला आठवते त्या काळात आणीबाणीनंतर तुरुंगातून सुटल्यानंतर या सर्वच विरोधी राजकीय नेत्यांचे आणि संघाच्या नेत्यांचे देशभर मोठे कौतुक होत होते. नव्या आघाडीच्या पक्षाच्या निवडणूक  प्रचारासाठी ते ठिकठिकाणी जात तेव्हा मोठया उत्साहाने त्यांचे रेल्वे स्टेशनवर स्वागत होई. देशात काँग्रेसविरोधात वातावरण तापले होते आणि त्या वातावरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, समाजवादी, जनसंघांचे नेते, मोरारजी  देसाईंसारखी जुनी काँग्रेसमंडळी मनाने अगदी एक झाली होती.  याला अपवाद म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा.  
आणीबाणी शिथिल झाल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देशातील अनेक वृत्तपत्रांत आणि नियतकालिकांत पहिल्यांदाच सकारात्मक प्रसिद्धी आणि आदराचे स्थान मिळाले.  संघाच्या नेत्यांच्या अनेक मुलाखती  प्रसिद्ध झाल्या. येरवडा तुरुंगातील वास्तव्यात संघाचे नेते आणि इतर राजकीय नेत्यांच्या झालेल्या चर्चेत संघाविषयी असलेले गैरसमज कसे दूर झाले आणि हे मळभ नाहीसे झाल्याने त्यांचे कसे  मनोमिलन झाले आहे याविषयीही लिहिले गेले. असे असले तरी बाबा आढाव यासारख्या काही समाजवादी नेत्यांचा संघाला अशाप्रकारे पावन करून घेण्यास ठाम विरोध केला होता. मात्र हा विरोध दुबळा ठरला. जनसंघ सामिल असलेल्या जनता पार्टीला महाराष्ट्रात १९७७ साली लोकसभेच्या ४८पैकी  २४ जागा मिळाल्या आणि जनता पक्षाला केंद्रात बहुमताने सत्ताही मिळाली.
मात्र समाजवादी नेत्यांचा  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आणि जनसंघाशी असलेला हा हनीमून काही काळच टिकला. जनता पक्षात सामील झालेल्या सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपापले पक्ष विसर्जित केले असले तरी जनसंघाच्या नेत्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेली आपली नाळ आणि निष्ठा कायम ठेवली आहे असा मुद्दा समाजवादी नेते मधू लिमये यांनीं उपस्थित केला आणि त्यामुळे बहुमत असूनही पंतप्रधान मोरारजी देसाई यांचे सरकार गडगडू लागले. जनसंघाचे नेते संघाशी असलेली नाळ कापणे शक्यच नव्हते, याची परिणती म्हणून काही काळाने जनसंघाचे सर्व नेत्यांनी जनता पक्षातून आपला तंबू हलवून भारतीय जनता पक्षाची स्थापना केली आणि अशाप्रकारे संघाबाबतच्या आपल्या निष्ठा कायम राखल्या. त्याचप्रमाणे लोहियावादी समाजवादी असलेल्या जॉर्ज फर्नांडिस, लालू यादव, मुलायम सिंग यादव, नितीश कुमार, शरद यादव  वगैरेंनीही  पुन्हा एकदा आपापले समाजवादी तंबू उभारले. 
मात्र जनता पक्षाची बोट अशाप्रकारे बुडाल्यानंतरही काही जॉर्ज फर्नांडिस, नितीश कुमार वगैरे  समाजवादी नेत्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेतृत्व मानणाऱ्या भाजपाशी आपले सहचर्य सुरूच ठेवले आणि अशाप्रकारे संघाचे अस्पृश्यत्व पुष्कळ प्रमाणात कमी झाले. अटल बिहारी वाजपेयी यांच्या रूपाने संघाचे प्रचारक असलेली व्यक्ती पंतप्रधान झाली आणि संघाला लोकमान्यता आणि राजाश्रयही लाभला. संघाचे प्रचारक असलेल्या  नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाने स्वबळावर केंद्रात सत्ता मिळवली तेव्हा अप्रत्यक्षरित्या संघपरिवाराचीच देशात सत्ता आली असा समज रूढ झाला. अर्थात यात वावगे असे काहीच नव्हते.   
असे असले तरी बुद्धिवंत वर्तुळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वाळीत टाकण्याची परंपरा कायम राहिली आहे. या बुद्धिवंत, विचारवंतांच्या वर्तुळात डाव्या, उदारमतवादी आणि पुरोगामी गटाने जो दबदबा निर्माण केला आहे, समाजात  आणि  वैचारिक क्षेत्रात आदर कमावला आहे, तसे भाग्य संघाशी निष्ठा असलेल्या व्यक्तींना सहसा लाभत नाही. उलट साहित्य, सामाजिक, संस्कृती  आणि  इतर क्षेत्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी बांधिलकी असणे वादग्रस्तच ठरले आहे.  ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर पानतावणे एकदा सामाजिक समरसता  मंचाच्या व्यासपीठावर गेले आणि यावर मोठे काहूर उठले होते. या प्रकरणाने  त्यांच्या आयुष्यभर पिच्छा पुरवला. 
माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारल्याने पुन्हा एकदा संघाची वैचारिक भूमिका आणि कार्य यावर चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसमध्ये राहून आता निवृत्तीच्या काळात संघाच्या व्यासपीठावर जाऊन प्रणबदा आपल्या आयुष्याची कमाई पणाला लावताहेत असेही म्हटले जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपीठावर राष्ट्रपती वा पंतप्रधान जावे याबाबत आता आक्षेप घेण्याची गरज नाही.  मात्र प्रणब मुखर्जी यांच्यासारख्या सर्वात  ज्येष्ठ काँग्रेस नेत्याच्या रूपाने या व्यासपीठावर अलीकडच्या काळात सर्वांत महामहीम व्यक्ती येते आहे यात शंकाच नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुढच्या वाटचालीत  याचा  नक्कीच लाभ होईल. 

Monday, May 28, 2018

आर्थिक बळाशिवाय इंदिरांचे सत्तेवर पुनरागमन

आर्थिक बळाशिवाय इंदिरांचे सत्तेवर पुनरागमन
सोमवार , २८ मे, २०१८कामिल पारखे
पैशाशिवाय निवडणुका जिंकता येत नाहीत असे आज म्हटले जाते. मात्र, आणिबाणीनंतर गमावलेली सत्ता परत मिळवण्याचे शिवधनुष्य इंदिरा गांधी यांनी कोणत्याही आर्थिक बळाशिवाय पेलले होते. 
गोव्यातील पणजी येथील मांडवीच्या तिरावर असलेल्या मांडवी हॉटेलसमोर पन्नास-साठ लोकांच्या घोळक्यात मी उभा होतो. थोड्याच वेळात तेथे आलेल्या एका कारमधून इंदिरा गांधी उतरल्या. ती वेळ संध्याकाळ पाचची असेल. त्यांच्या डोक्यावरील केशसंभार पूर्ण सफेद होता. रोडच्या प्रवासाने त्यांचा चेहरा थकलेला जाणवत होता. तरीही डोक्यावरील पदर सावरीत स्मित करत त्यांनी समोरच्या लोकांना अभिवादन केले आणि विजेच्या चपळाईने मागे वळत आमच्या समोरच त्या हॉटेलच्या पायऱ्या चढू लागल्या. १९७९ सालच्या डिसेंबरची ही घटना आहे. दशकभर देशाच्या पंतप्रधान असलेल्या आणि आणीबाणीनंतर सत्तेतून पायउतार झालेल्या इंदिरा गांधींना अनपेक्षितरित्या अगदी जवळून मी पाहत होतो. त्या वेळेत त्यांच्याबद्दल माझ्या मनात जराही आदर नव्हता. काही वर्षांपुर्वी शाळेत असताना बांगलादेश युद्धाच्या काळात आणि  नंतरच्या त्यांच्या  'गरिबी हटाव' या कार्यक्रमामुळे मी त्यांचा फॅन किंवा भक्त बनलो होतो. नंतरच्या आणीबाणीनंतर देशातील इतर लोकांप्रमाणे मीही  त्यांचा कडवा विरोधक बनलो होतो. मात्र आणीबाणीनंतर सत्तेवर आलेल्या जनता पार्टीच्या नेत्यांनी जनतेची घोर निराशा केली होती. मोरारजी देसाईनंतर पंतप्रधान झालेल्या चौधरी चरणसिंगांनी बहुमत नसल्याने राजिनामा दिला होता आणि देशात अडीच वर्षांतच पुन्हा निवडणुका जाहिर झाल्या होत्या. या निवडणुकीच्या प्रचारानिमित्त इंदिरा गांधी पणजीत आल्या होत्या. 
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी पणजीतील मुख्य रस्त्यावर असलेल्या मांडवी हॉटेलात उतरल्या यामागे काही कारणे होती. सत्तेत नसल्याने डोना पावला येथून जवळ असलेल्या काबो राज निवास येथे त्यांना आतिथ्य मिळणे अशक्य होते. आणीबाणी पर्वानंतर इंदिरा गांधीविषयी लोकमानसांत प्रचंड घृणा निर्माण  झाली होती आणि राजकीयदृष्टया त्या अस्पृश्य बनल्या होत्या. सन १९८० आधी गोव्यात फाइव्ह स्टार हॉटेल अगदीच हाताच्या बोटावर मोजण्याइतके होते. 
हॉटेल मांडवी हे पणजीतील एक मोठे हॉटेल होते. त्या संध्याकाळी मिरामारशेजारील कंपाला ग्राउंडवर इंदिरा गांधी यांची सभा होती. निवडणूक प्रचारासाठी कारने लांबचा प्रवास केल्यानंतर सभेपूर्वी फ्रेश होण्यासाठी मांडवी हॉटेलमध्ये त्या उतरल्या होत्या. 
आणीबाणीनंतरच्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधींच्या काँग्रेस पक्षाचा भारताच्या उत्तरेतील नऊ राज्यात पार धुव्वा उडाला होता. तेथे या पक्षाला लोकसभेची एकही जागा न मिळाल्याने मोरारजी सरकारने तेथील राज्य सरकारे तडकाफडकी बरखास्त करून नव्याने निवडणुका घेतल्या होत्या. त्या सर्व राज्यांत जनता पक्षाची सरकारे निवडूनही आली होती. इंदिरा गांधी सत्ताभ्रष्ट झाल्यानंतर त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी म्हणजे के ब्रह्मानंद रेड्डी, यशवंतराव चव्हाण वगैरेंनी त्यांना पक्षातून काढून टाकले होते. केंद्रातील आणि महत्वाच्या राज्यातून सत्तेबाहेर झाल्याने इंदिरा काँग्रेस या आपल्या नव्या पक्षाचा इंदिरा गांधी प्रचार करता होत्या. काँग्रेस पक्षाची अगदी मूठभर नेतेच त्यांच्याबरोबर राहिली होती.
केंद्रातील आणि महत्वाच्या राज्यांतील सत्ता गमावल्यामुळे इंदिरा गांधींना निवडणूक प्रचारासाठी आर्थिक चणचण भासत होती. त्यांना आर्थिक मदत करण्यास कुणी तयार नव्हते इतक्या त्या राजकीयदृष्ट्या बदनाम झाल्या होत्या. चार्टर्ड फ्लाईट सोडाच पण थोड्या अंतरावर जाण्यासाठी हेलिकॉप्टर घेणेही आर्थिकदृष्ट्या मुश्किल होते. त्यामुळे प्रवासी विमानाने किंवा अनेक किलोमीटरचा प्रवास त्या मोटारीने करता होत्या. त्या काळात दिवसाच्या चोवीस तासांपैकी अनेक  तास त्या प्रवासात असत, या प्रवासातच झोपून सभेपूर्वी ताजेतवाने होऊन त्या पुढील सभेच्या तयारीत लागत. या निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांनी संपूर्ण देश अक्षरश: पिंजून काढला होता. त्यांच्याशिवाय त्यांच्या पक्षात दुसरा प्रभावी असा नेता नव्हताच.  अशाच एका निवडणूक  सभेपूर्वी मला त्यांना जवळून पाहण्याचा योग आला होता.  
त्यानंतर एका तासातच इंदिराजींचे भाषण  ऐकण्यासाठी कम्पाला ग्राऊण्डवर मी हजर होतो. इंदिरा गांधी या अटल बिहारी वाजपेयी किंवा नरेन्द्र मोदी यांच्यासारख्या वक्त्या नव्हत्या. मात्र त्यांचे भाषण अगदी घणाघाती होते. इंदिराजी आपल्या भाषणात कुठल्याही एका व्यक्तीचे कधीही नाव घेत नसत. आपल्या भाषणात त्यांनी  सत्ताधारी जनता पक्षाच्या अंतर्गत लाथाळ्यांवर आणि  नाकर्तेपणावर हल्ला चढवत आपणच देशाची स्थिती सुधारू शकतो हे श्रोत्यांला पटवले. ते भाषण ऐकण्याआधी मी त्यांचा कट्टर विरोधक होतो पण त्यांचे भाषण संपल्यानंतर मी त्यांचा कट्टर समर्थक झालो होतो हे कबूल करायलाच हवे. तेव्हा  मी बी. ए. च्या  शेवटच्या वर्षाला  होतो,  एकवीस वर्षे पूर्ण केली नसल्याने मला मतदानाचा अधिकार नव्हता. नाहीतर माझे मत इंदिराजींच्या पक्षालाच दिले असते.  त्याकाळात देशातील राजकीय स्थिती पाहता कुणीही इंदिराजींवर विश्वास ठेविलच अशी परिस्थिती होती. त्यानंतर निवडणुका पार पडल्या आणि आणीबाणीत अगदी पानिप[त झालेल्या इंदिरा गांधींच्या पक्षाला आधी कधीही मिळाल्या नव्हत्या इतक्या लोकसभेच्या जागा मिळाल्या. इंदिराजी पुन्हा पंतप्रधान बनल्या.  
त्यानंतर कॉमनवेल्थच्या ३९ राष्ट्रप्रमुखांची अनौपचारिक बैठक (रिट्रीट)  गोव्यात १९८३ साली पार पडली.  तेव्हा 'द नवहिंद टाइम्स' या स्थानिक इंग्रजी वृत्तपत्राचा बातमीदार या नात्याने या परिषदेच्या आणि परिषदेच्या यजमान पंतप्रधान इंदिरा गांधींच्या संदर्भात अनेक बातम्या मी लिहिल्या. सुरक्षेच्या कारणास्तव त्यावेळी तीन-चार दिवस गोव्यात ताज व्हिलेज येथे असलेले  इंदिराजी तसेच ब्रिटिश पंतप्रधान मार्गारेट थॅचर, झिम्बाब्वे राष्ट्राध्यक्ष रॉबर्ट मुगाबे, ऑस्ट्रेलियन पंतप्रधान बॉब हॉक वगैरेंना जवळून भेटण्याचा योग मात्र आला नाही. त्यावेळी तीनच वर्षांपूर्वी इंदिराजींना अगदी जवळून  न्याहाळण्याची संधी कशी मिळाली याचे सतत आठवण यायची.    
आज पैशाच्या बळाशिवाय निवडणुका जिंकणे शक्य नाही असे म्हटले जाते. वृत्तपत्रांत पहिल्या पानांवर सतत जाहिराती, न्यूज चॅनेल्सवर जाहिरातींचा भडीमार  याशिवाय निवडणुका जिंकता येईल का अशी शंका येते. मात्र प्रचंड परिश्रम, विरोधकांच्या मर्मस्थळांवर हल्ला करण्याची  हातोटी, जनतेमधील असंतोषास वाट देऊन लोकमानस आपल्या बाजुने वळवण्याची कला या जोरावर इंदिराजींनी राजकीय आणि आर्थिक सत्तेचे पाठबळ नसता केंद्रात सत्तेवर दमदार पुनरागमन करून दाखवले होते.