काल दुपारी पावसाची रिपरिप चालू असताना डोक्यात पावसाळी कॅप, हातात छत्री अशा संरक्षणात नारायण पेठेतल्या मुंजाबाचा बोळमध्ये चालत असताना नजर सहज जवळच्या इमारतीकडे गेली.
`हिंदी राष्ट्रभाषा भवन' हे नाव वाचून मी चमकलो. एकदम अण्णा आठवले.
कुठली वस्तू, वास्तू आणि व्यक्ती आपल्यासमोर अचानक येईल हे सांगता येत नाही. तरी दिल्लीत आणि देशभर चाललेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कालचा हा योगायोग पाहून गंमत वाटली.
`सुगावा प्रकाशना'चे कार्यालय अलीकडेच `बेडेकर मिसळ' समोर स्थलांतरीत झाले आहे, तिकडे जाताना हे घडले.
साडेतीन दशकांपूर्वी हिंदी राष्ट्रभाषा भवन या वास्तूला मी नियमितपणे आणि भक्तिभावाने भेट देत असे.
सन १९८९ च्या अखेरीस `इंडियन एक्सप्रेस'च्या नव्याने सुरु झालेल्या पुणे आवृत्तीत बातमीदार म्हणून रुजू झालो होतो.
त्यावेळी एका बातमीच्या संदर्भात अण्णा हजारे यांच्याशी एकदा गाठभेट झाली होती आणि आमच्या दोघांचा स्नेहसंबंध हळूहळू वाढत गेला होता.
पारनेर तालुक्यातून राळेगण सिद्धी या आपल्या गावातून पुण्यात आल्यावर अण्णांचा या `हिंदी राष्ट्रभाषा भवन'मध्ये मुक्काम असायचा.
त्याकाळात पुण्यातले अण्णा म्हणजे `वनराई' या पर्यावरण चळवळीचे संस्थापक, माजी केंद्रीय मंत्री मोहन धारीया या राष्ट्रभाषा भवनचे काम पाहत असत.
नव्वदच्या दशकात घरोघरी लँडलाईन फोन नसायचे, मोबाईलचा जमाना येण्यास फार वेळ होता. रानडे इन्स्टिट्यूटसमोर असलेल्या हॉटेल हिल व्ह्यूच्या प्रिया लॉज येथे मी मंथली कॉटबेसिस राहायचो.
आता नक्की आठवत नाही, मात्र अण्णा पुण्यात कधी येणार आहेत, `राष्ट्रभाषा भवन' मध्ये किती दिवस राहणार आहेत हे मला आधीच कळायचे.
तेथे जाऊन मी त्यांना भेटायचो, गप्पा मारायचो, त्यांची बातमीसाठीचे प्रसिद्धीपत्रके अण्णा मला यावेळी द्यायचे.
`इनलँड लेटर'वर टाईप केलेली प्रसिद्धी पत्रके अण्णा मला पोस्टाने पाठवत असत, त्याखाली किसन बाबुराव अण्णा हजारे अशी सही असायची.
त्याकाळात नगर जिल्ह्यातले स्थानिक पत्रकार अण्णांच्या जवळसुद्धा फिरकत नसत, त्यांना प्रसिद्धी देण्याचे तर फारच दूर.
अण्णांना राज्यपातळी आणि नंतर राष्ट्रीय पातळीवर आणण्याची घोडचूक म्हणा कि पाप म्हणा इंग्रजी पत्रकारितेतील आम्ही काही मोजक्या लोकांनी केले.
त्यावेळी इंडियन एक्सप्रेससाठी मी आणि माझा सहकारी नरेन करुणाकर पुण्यातून बातम्या द्यायचो, टाइम्स ऑफ इंडियाची पुणे आवृत्ती नव्हती तरी अभय वैद्य हे या दैनिकासाटीं पुण्याच्या बातम्या द्यायचे.
नरेन करुणाकर आणि अभय वैद्य यांना घेऊन मी राळेगण सिद्धीला गेलो होतो,
तेथे अण्णांसोबत फोटोसेशन झाले होते. ती कृष्णधवल आणि रंगीत फोटो आजही माझ्याकडे आहेत.
अण्णा त्यावेळी साठीत होते तर मी तिशीच्या उंबरठ्यावर. पत्रकारितेत येऊन मी दशक पार केले होते आणि अण्णा किती मिडिया सॅव्ही आहेत याचे अनुभव मला अनेकदा येत होते.
एकदा तर अण्णांच्या विविध क्षेत्रांतील कामांची नीट ओळख करून घेण्यासाठी मी राळेगणला दोन दिवस मुक्कामच ठोकला होता.
मला आठवते तेव्हा अण्णांच्या सचिवाने मला अण्णांवरील पुस्तक देण्यासाठी त्या पुस्तकाची किंमत सांगितली. ते पुस्तक आम्हाला फुकटात देण्याची त्याची तयारी नव्हती.
शेजारीच उभ्या असलेल्या अण्णांनी मात्र काही न बोलता ते पुस्तक माझ्या खांद्यावरच्या शबनम बॅगेत अगदी अलगदपणे टाकले होते.
अण्णा पक्के मिडिआ सॅव्ही आहेत याची त्याचवेळेत पहिल्यांदा मला जाणीव झाली !
बातम्या देणे हे आम्हा पत्रकारांचे दैनंदिन काम. आमच्या या राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील बातम्यांत अण्णा झळकू लागले आणि त्यांच्याभोवतीचे प्रसिद्दी वलय
वाढू लागले.
संजय सोनवणी यांनी १९९३ साली प्रकाशित केलेल्या `उत्तुंग' या माझ्या व्यक्तिचित्रण संग्रहात डॉ. बाबा आढाव, शंतनुराव किर्लोस्कर, सय्यदभाई, शिरूभाऊ लिमये, डॉ जयंत नारळीकर, फादर डॉ. मॅथ्यू लेदर्ले आणि शकुंतला परांजपे, यांच्यावर प्रकरणे आहेत.
त्याच पुस्तकात अण्णा हजारे यांच्यावरसुद्धा एक प्रकरण आहेच.
अण्णांनी सुरु केलेल्या भ्रष्टाचार निर्मूलन चळवळीत नंतर त्यावेळचे भलेभले लोक सामिल झाले. एके काळचे तरुण तुर्क असलेल्या मोहन धारिया यांनी हजारे यांना आधीच पाठबळ दिले होते.
समाजवादी नेते डॉ. बाबा आढाव आणि हरीत वसई बचाव चळवळीचे नेते फादर फ्रान्सिस दिब्रिटो अशी काही मंडळीसुद्धा अण्णांच्या आंदोलनात सक्रियरित्या सामिल झाली होती.
मात्र अण्णांनी या मंडळींचा अवसानघात केला आणि हे लोक त्यांच्यापासून दूर गेले ते परत कधी न येण्यासाठी.
भ्रष्टाचारविरोधी आंदोलन, उपोषण स्थगिती याबाबत अण्णा आपल्या या सवंगडी लोकांना पूर्ण अंधारात ठेवत असत, मनमानी निर्णय घेत असत हे त्यामागचे एक कारण होते.
हिंदी राष्ट्रभाषा भवनाजवळ काल आलो आणि अचानक हे सर्व आठवले.
Camil Parkhe July 24, 2026