Did you like the article?

Showing posts with label Abhay Vaidya. Show all posts
Showing posts with label Abhay Vaidya. Show all posts

Monday, July 27, 2026

 


काल दुपारी पावसाची रिपरिप चालू असताना डोक्यात पावसाळी कॅप, हातात छत्री अशा संरक्षणात नारायण पेठेतल्या मुंजाबाचा बोळमध्ये चालत असताना नजर सहज जवळच्या इमारतीकडे गेली.

`हिंदी राष्ट्रभाषा भवन' हे नाव वाचून मी चमकलो. एकदम अण्णा आठवले.
कुठली वस्तू, वास्तू आणि व्यक्ती आपल्यासमोर अचानक येईल हे सांगता येत नाही. तरी दिल्लीत आणि देशभर चाललेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कालचा हा योगायोग पाहून गंमत वाटली.
`सुगावा प्रकाशना'चे कार्यालय अलीकडेच `बेडेकर मिसळ' समोर स्थलांतरीत झाले आहे, तिकडे जाताना हे घडले.
साडेतीन दशकांपूर्वी हिंदी राष्ट्रभाषा भवन या वास्तूला मी नियमितपणे आणि भक्तिभावाने भेट देत असे.
सन १९८९ च्या अखेरीस `इंडियन एक्सप्रेस'च्या नव्याने सुरु झालेल्या पुणे आवृत्तीत बातमीदार म्हणून रुजू झालो होतो.
त्यावेळी एका बातमीच्या संदर्भात अण्णा हजारे यांच्याशी एकदा गाठभेट झाली होती आणि आमच्या दोघांचा स्नेहसंबंध हळूहळू वाढत गेला होता.
पारनेर तालुक्यातून राळेगण सिद्धी या आपल्या गावातून पुण्यात आल्यावर अण्णांचा या `हिंदी राष्ट्रभाषा भवन'मध्ये मुक्काम असायचा.
त्याकाळात पुण्यातले अण्णा म्हणजे `वनराई' या पर्यावरण चळवळीचे संस्थापक, माजी केंद्रीय मंत्री मोहन धारीया या राष्ट्रभाषा भवनचे काम पाहत असत.
नव्वदच्या दशकात घरोघरी लँडलाईन फोन नसायचे, मोबाईलचा जमाना येण्यास फार वेळ होता. रानडे इन्स्टिट्यूटसमोर असलेल्या हॉटेल हिल व्ह्यूच्या प्रिया लॉज येथे मी मंथली कॉटबेसिस राहायचो.
आता नक्की आठवत नाही, मात्र अण्णा पुण्यात कधी येणार आहेत, `राष्ट्रभाषा भवन' मध्ये किती दिवस राहणार आहेत हे मला आधीच कळायचे.
तेथे जाऊन मी त्यांना भेटायचो, गप्पा मारायचो, त्यांची बातमीसाठीचे प्रसिद्धीपत्रके अण्णा मला यावेळी द्यायचे.
`इनलँड लेटर'वर टाईप केलेली प्रसिद्धी पत्रके अण्णा मला पोस्टाने पाठवत असत, त्याखाली किसन बाबुराव अण्णा हजारे अशी सही असायची.
त्याकाळात नगर जिल्ह्यातले स्थानिक पत्रकार अण्णांच्या जवळसुद्धा फिरकत नसत, त्यांना प्रसिद्धी देण्याचे तर फारच दूर.
अण्णांना राज्यपातळी आणि नंतर राष्ट्रीय पातळीवर आणण्याची घोडचूक म्हणा कि पाप म्हणा इंग्रजी पत्रकारितेतील आम्ही काही मोजक्या लोकांनी केले.
त्यावेळी इंडियन एक्सप्रेससाठी मी आणि माझा सहकारी नरेन करुणाकर पुण्यातून बातम्या द्यायचो, टाइम्स ऑफ इंडियाची पुणे आवृत्ती नव्हती तरी अभय वैद्य हे या दैनिकासाटीं पुण्याच्या बातम्या द्यायचे.
नरेन करुणाकर आणि अभय वैद्य यांना घेऊन मी राळेगण सिद्धीला गेलो होतो,
तेथे अण्णांसोबत फोटोसेशन झाले होते. ती कृष्णधवल आणि रंगीत फोटो आजही माझ्याकडे आहेत.
अण्णा त्यावेळी साठीत होते तर मी तिशीच्या उंबरठ्यावर. पत्रकारितेत येऊन मी दशक पार केले होते आणि अण्णा किती मिडिया सॅव्ही आहेत याचे अनुभव मला अनेकदा येत होते.
एकदा तर अण्णांच्या विविध क्षेत्रांतील कामांची नीट ओळख करून घेण्यासाठी मी राळेगणला दोन दिवस मुक्कामच ठोकला होता.
मला आठवते तेव्हा अण्णांच्या सचिवाने मला अण्णांवरील पुस्तक देण्यासाठी त्या पुस्तकाची किंमत सांगितली. ते पुस्तक आम्हाला फुकटात देण्याची त्याची तयारी नव्हती.
शेजारीच उभ्या असलेल्या अण्णांनी मात्र काही न बोलता ते पुस्तक माझ्या खांद्यावरच्या शबनम बॅगेत अगदी अलगदपणे टाकले होते.
अण्णा पक्के मिडिआ सॅव्ही आहेत याची त्याचवेळेत पहिल्यांदा मला जाणीव झाली !
बातम्या देणे हे आम्हा पत्रकारांचे दैनंदिन काम. आमच्या या राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील बातम्यांत अण्णा झळकू लागले आणि त्यांच्याभोवतीचे प्रसिद्दी वलय
वाढू लागले.
संजय सोनवणी यांनी १९९३ साली प्रकाशित केलेल्या `उत्तुंग' या माझ्या व्यक्तिचित्रण संग्रहात डॉ. बाबा आढाव, शंतनुराव किर्लोस्कर, सय्यदभाई, शिरूभाऊ लिमये, डॉ जयंत नारळीकर, फादर डॉ. मॅथ्यू लेदर्ले आणि शकुंतला परांजपे, यांच्यावर प्रकरणे आहेत.
त्याच पुस्तकात अण्णा हजारे यांच्यावरसुद्धा एक प्रकरण आहेच.
अण्णांनी सुरु केलेल्या भ्रष्टाचार निर्मूलन चळवळीत नंतर त्यावेळचे भलेभले लोक सामिल झाले. एके काळचे तरुण तुर्क असलेल्या मोहन धारिया यांनी हजारे यांना आधीच पाठबळ दिले होते.
समाजवादी नेते डॉ. बाबा आढाव आणि हरीत वसई बचाव चळवळीचे नेते फादर फ्रान्सिस दिब्रिटो अशी काही मंडळीसुद्धा अण्णांच्या आंदोलनात सक्रियरित्या सामिल झाली होती.
मात्र अण्णांनी या मंडळींचा अवसानघात केला आणि हे लोक त्यांच्यापासून दूर गेले ते परत कधी न येण्यासाठी.
भ्रष्टाचारविरोधी आंदोलन, उपोषण स्थगिती याबाबत अण्णा आपल्या या सवंगडी लोकांना पूर्ण अंधारात ठेवत असत, मनमानी निर्णय घेत असत हे त्यामागचे एक कारण होते.
हिंदी राष्ट्रभाषा भवनाजवळ काल आलो आणि अचानक हे सर्व आठवले.

Camil Parkhe July 24, 2026



Thursday, October 28, 2021

टाइम्स ऑफ इंडियाचे पुण्यातले हे ऑफिस.

 हा फोटो जुन्या काळातला आहे ते इथल्या कॉम्पुटरचा भलामोठा आकार पाहून सहज लक्षात येईलच. टेबलावर इंटरकॉमवर बोलताना फोटो काढण्याची त्यावेळी क्रेझ होती. तर हा फोटो असेल 1999च्या आसपासचा. टाइम्स ऑफ इंडियाचे पुण्यातले फर्ग्यूसन कॉलेज रोडवरचे नव्यानेच स्थलांतरीत झालेले हे ऑफिस. हा बहुधा संजय पेंडसे याने काढलेला फोटो.

इथे मला पहिल्यांदाच स्वतःला असलेली मऊमऊ कुशनची गोलगोल फिरणारी रंगीत एक्सयेक्युटीव्ह चेअर, स्वतंत्र क्यूबिकल आणि स्वतःचा एक कॉम्पुटर मिळाला! पत्रकारितेच्या व्यवसायात असली चैन मी त्यापूर्वी गोव्यात नवहिंद टाइम्स मध्ये, औरंगाबादला लोकमत टाइम्समध्ये वा पुण्यात कॅम्पमधल्या इंडियन एक्सप्रेस ऑफिसमध्ये मी कधी अनुभवली नव्हती.
याआधी लाकडी खुर्ची किंवा बाकावर बसून सामायिक असलेल्या गोदरेज वा रेमिंगटन टाईपरायटरवर आम्ही बातम्या बडवत असायचो.
वैशाली हॉटेल शेजारचे टाइम्सचे ऑफिस हे पुण्यातले पहिले वातानुकुलीत वृत्तपत्र ऑफिस. इथे मी पहिल्यांदा इंटरनेटवर माझे लॉगिन केले. माझे ज्येष्ठ सहकारी आणि टाइम्सचे चिफ रिपोर्टर अभय वैद्य यांनी इंडियटाइम्स डॉटकोम वर माझे अकाउंट उघडून दिले आणि मी एका नव्या विश्वात, आभासी युगात प्रवेश केला.
त्याआधी जवळजवळ सातआठ वर्षाआधी आयुकाचे डॉ जयंत नारळीकर यांची मुलाखत घेताना ईमेल हा शब्द पहिल्यांदा कानावर पडला मात्र त्यावेळी तो शब्द डोक्यावरून गेला होता. आता त्या शब्दाचा अर्थ कळाला.
त्याकाळात मराठी दैनिकांतले रिपोर्टर लोक हाताने बातम्या लिहायचे, आम्ही इंग्रजीत टाईपरायटरवर बातम्या लिहायचो... कॉम्प्युटरचा बातमीदारांनी आणि उपसंपादकांनी वापर करावा म्हणून सक्ती झाली तेव्हा अगदी नाखुशीने लोक संगणकांचा वापर करु लागले.
याच काळात टाइम्स मॅनेजमेंट आम्हा सर्वांना पेजर देणार असे सांगण्यात आले आणि मोबाईल आल्याने पेजर उपकरण दीड वर्षांतच काळबाह्य ठरले.
याच काळात एनडीटीव्ही च्या रुपाने पहिले चोवीस तास बातम्या देणारे पहिले भारतीय न्यूज चॅनल सुरु झाले...
असेच काम करताना टीव्हीकडे नजर असताना एका रविवारी संध्याकाळी त्या दशकातील नव्हे मानवी इतिहासातील एक मोठी ब्रेकिंग न्यूज पाहिली आणि हे समोर काय दाखवतात तें कळण्यासाठी इतरांचे टीव्हीकडे लक्ष वेधून घेतले.
अमेरिकेत वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाल्याच्या घटनेस अलिकडेच दोन दशके झाली तेव्हा टाइम्स ऑफिसातली ही घटना आठवली.
मी मोबाईल वापरायला सुरुवात केली ती सकाळ ग्रुपच्या महाराष्ट्र हेराल्ड ला 2004 साली जॉईन झाल्यानंतर एकदोन वर्षांनी. याचकाळात गुगल युग सुरु झाले आणि जी -मेल सुद्धा....जी मेल अकाउंट उघडले तेव्हा गुगलचा संचार इतका वाढेल अशी त्यावेळी कल्पनाही केली नव्हती.
हा फोटो पाहिला आणि या आठवणी घटना नजरेसमोर आल्या.