Did you like the article?

Showing posts with label Ram Katha: Utpatti Aur Vikas. Show all posts
Showing posts with label Ram Katha: Utpatti Aur Vikas. Show all posts

Sunday, January 14, 2024

फादर कामिल बुल्के


हिंदी भाषेतील पहिली डॉक्टरेट पदवी मिळवण्याचा मान जन्माने बेल्जियम आणि ख्रिस्ती धर्मगुरू असलेल्या फादर कामिल बुल्के यांना मिळाला. त्यांच्या प्रबंधाचा विषय होता : ‘रामकथा : उत्पत्ती और विकास’. फादर बुल्के यांचा इंग्रजी-हिंदी शब्दकोश आजही नावाजला जातो. 

‘ख्रिस्ती मिशनरींचे योगदान’ या पुस्तकातील हे एक प्रकरण...  ..

भारतीय संस्कृतीशी एकरूप होऊन महान कार्य केल्याबद्दल मदर तेरेसा यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन सरकारने त्यांचा गौरव केला. त्याचप्रमाणे रामकथेवर मूलभूत स्वरूपाचे संशोधन करणाऱ्या, इंग्रजी-हिंदी शब्दकोशाची निर्मिती करणाऱ्या फादर कामिल बुल्के या जन्माने बेल्जियम असणाऱ्या ख्रिस्ती धर्मगुरूचाही ‘पद्मश्री’ हा सन्मान देऊन गौरव करण्यात आला. प्राच्यविद्यापंडित, संपूर्ण बायबलचे हिंदीत रूपांतर करणारे अनुवादक आणि हिंदी व संस्कृत भाषेचे पंडित म्हणून फादर बुल्के यांचा खास उल्लेख केला जातो.

फादर कामिल बुल्के यांचा जन्म बेल्जियम देशात १९०९ साली झाला. कॅथोलिक धर्मगुरू होण्यासाठी येशूसंघात दाखल होण्यापूर्वी त्यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. भारतात त्यांनी १९३५ साली पाय ठेवला आणि १९४१ साली धर्मगुरू म्हणून त्यांना दीक्षा देण्यात आली. कलकत्ता विद्यापीठात त्यांनी संस्कृत विषयात पदवी संपादन केली, त्यानंतर अलाहाबाद विद्यापीठात त्यांनी हिंदी विषयात डॉक्टरेट मिळवली. त्यांच्या प्रबंधाचा विषय होता, ‘रामकथा : उत्पत्ती और विकास’.

विशेष बाब म्हणजे फादर बुल्के यांचा हा प्रबंध अलाहाबाद विद्यापीठातील हिंदी साहित्यावरील पहिलाच हिंदी प्रबंध होता. तोपर्यंत या विद्यापीठात या विषयावरील सर्व प्रबंध इंग्रजीतूनच लिहिले जात असत. फादर बुल्के यांचा हा प्रबंध स्वातंत्र्यप्राप्तीच्या सुमारास सादर केला गेल्याने या प्रबंधाचे लेखक त्या वेळी प्रकाशझोतात आले. अलाहाबाद विद्यापीठाने हा प्रबंध १९५० साली प्रसिद्ध केला आणि त्या प्रबंधाची विस्तारित म्हणजे ८१८ पानांची आवृत्ती झाली. या तीन आवृत्तींच्या प्रकाशनावरून जवळजवळ पंचवीस वर्षे फादर बुल्के हे रामकथेच्या कसे प्रेमात पडले होते हे दिसून येते.

फादर बुल्के यांचे रामकथेवरील हे संशोधन केवळ हिंदी भाषिकांपुरते सीमित राहिलेले नाही. केरळ साहित्य अकादमीने १९७८ साली या पुस्तकाचे मल्याळम भाषेत रूपांतर केले.

फादर बुल्के १९५० ते १९७७ या काळात यांची येथील सेंट झेविअर कॉलेजमध्ये हिंदी आणि संस्कृत विषयांचे विभागप्रमुख होते. यावरून त्यांनी या विषयात किती प्रावीण्य मिळवले होते, याची कल्पना येते.

बेल्जियममधून भारतात आल्यापासूनच फादर बुल्के या देशाच्या विशेषत: हिंदी भाषिक उत्तर भारताच्या प्रेमात पडले. त्या काळात भारतात येणारे बहुतेक मिशनरी ख्रिस्ती धर्माचा प्रसार हेच आपले जीवितध्येय समजत असत. फादर बुल्के यांनी मात्र धर्मगुरूपदाचे कार्य पार पाडण्यासाठी सर्वप्रथम स्थानिक लोकांशी आणि संस्कृतीशी एकरूप होण्यावर अधिक भर दिला. त्यासाठी त्यांनी १९५० साली भारतीय नागरिकत्व स्वीकारून आपल्या मायदेशाची नाळ कायमची तोडून टाकली.

फारद बुल्के यांची साहित्यक्षेत्रातील कार्याची दखल घेऊन १९५० साली बिहार राज्याच्या राज्यपालांनी बिहार साहित्य अकादमीचे संस्थापक सदस्य म्हणून त्यांची नेमणूक केली. त्यानंतरच्या काळात राष्ट्रीय पातळीवरील अनेक महत्त्वाच्या समित्यांचे सदस्य म्हणून केंद्र सरकारतर्फे त्यांची निवृत्ती करण्यात आली. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील अनेक साहित्य संस्थांचे सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले. राष्ट्रीय पातळीवर हिंदी भाषेचा राष्ट्रभाषा म्हणून मोठ्या प्रमाणात वापर व्हावा म्हणून त्यांनी प्रयत्न केले.

रामकथेच्या संशोधनानंतर फादर बुल्के यांनी इंग्रजी-हिंदी शब्दकोशाची निर्मिती आणि संपूर्ण बायबलचे हिंदीत रूपांतर करण्याच्या कार्यात स्वत:ला वाहून घेतले. त्यांचा इंग्रजी-हिंदी कोश १९६८ साली प्रसिद्ध झाला. त्यानंतर या शब्दकोशाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. १९७७ साली संपूर्ण नव्या कराराचा म्हणजे बायबलच्या दुसऱ्या खंडाचा त्यांनी केलेला अनुवाद प्रसिद्ध झाला. संपूर्ण बायबलचा हिंदी अनुवाद १९८६ साली प्रसिद्ध झाला. त्यांच्या निधनानंतर रेडिओवर आणि दूरदर्शनवर या प्राच्यविद्यापंडिताच्या कार्यावर आधारित खास कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

फादर बुल्के हिंदी भाषिक प्रदेशातील बिगर ख्रिस्ती समाजात ‘बाबा बुल्के’ म्हणून ओळखले जात. हिंदी आणि संस्कृत व्यतिरिेक्त फादर बुल्के यांना हिब्रू, ग्रीक, लॅटिन भाषा अवगत होत्या. डच, फ्रेंच आणि जर्मन भाषांतसुद्धा ते उत्तमरीत्या संभाषण करत असत.

कॅथोलिक चर्चमध्ये आंतरधर्मीय सामंजस्याचे आणि सुसंवादाचे वारे १९६२साली भरलेल्या दुसऱ्या व्हॅटिकन परिषदेनंतर सुरू झाले, पण या परिषदेपूर्वीच फादर बुल्के यांनी या दिशेने वाटचाल सुरू केली होती. त्यामुळेच त्यांना अनेकदा विरोध आणि टीकेस तोंड द्यावे लागले. आज मात्र फादर बुल्के यांनी केलेल्या कार्यास सगळीकडे मान्यता मिळाली आहे. ‘जोपर्यंत जगात रामकथा सांगितली जाते, तोपर्यंत बाबा बुल्के हे नाव विसरले नाव विसरले जाणार नाही, असे त्यांच्या मृत्यूनंतर एका हिंदी पंडिताने म्हटले होते.

Camil Parkhe