Did you like the article?

Showing posts with label Balgandharv. Show all posts
Showing posts with label Balgandharv. Show all posts

Wednesday, July 19, 2023

 

एकदोन महिन्यांपुर्वीची ही गोष्ट. दादरा, नगर हवेली केंद्रशासित प्रदेशातून मुंबईकडे परत येत होतो. कारच्या ड्रायव्हरने महमद रफी, किशोर कुमार, लता मंगेशकर आणि आशा भोसले यांची जुनी `टॉप हिट्स’ हिंदी गाणी लावली होती. एकापाठोपाठ गाणी ऐकू येत होती आणि मी चमकलो .
साठीच्या आणि सत्तरीच्या दशकांतील त्यापैकी अनेक गाणी मला जवळजवळ तोंडपाठ होती. त्या गाण्याचं एखादं कवडं गायलं जात असताना त्यापुढील शब्द मला आठवत होते आणि पुढची संगीतधून सुद्धा.!
आहे की नाही गंमत? आणि हे कसं शक्य आहे?'' असं मी स्वतःलाच विचारत होतो.
याचा सरळसरळ अर्थ म्हणजे ही जुनी गाणी मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात माझ्या नकळत आपली जागा राखून होती आणि आता जागृत पटलावर येत होती. ही गाणी कुठल्या चित्रपटातील आहेत, कोण पार्श्वगायक आणि पार्श्वगायिका आहेत, कुणा अभिनेत्यावर किंवा अभिनेत्रीवर हे गाणं चित्रित झालं आहे, हेसुद्धा स्पष्टपणे आठवत होते.
`जब जब फुल खिले, संगम, वक्त, जंगली, गीत, अंदाज, आराधना, हाथी मेरे साथी, राम और श्याम, तेरे मेरे सपने, मुघले आझम अशी त्या चित्रपटांची कितीतरी मोठी यादी होती. `अच्छा, तो हम चलते है...' अशी कितीतरी उडत्या चालीची कितीतरी गाणी अगदी तोंडपाठ.
कारचा ड्रायव्हर माझ्यापेक्षा वयानं लहानच होता, त्यामुळं त्या गाण्यासंबंधीची त्याला माहित नसलेली माहिती मी त्याला सांगत होतो. उदाहरणार्थ, `वक्त' चित्रपटातलं शशिकला यांच्यावर चित्रित झालेलं `आगे भी जाने न तू, पीछे भी जाने न तू' हे गाणं आणि ते सांगत असताना माझ्या स्मृतीतून अचानक वर येणाऱ्या या माहितीबद्दल मी स्वतःच अचंबित होत होतो.
ही जुनीपुराणी गाणी मला आणि तसं पाहिलं तर माझ्या पिढीतल्या अनेक लोकांना मुखोदगत असण्याचं खास कारण म्हणजे काही दशकांपुर्वी रेडिओ हे एकमेव करमणुकीचं, ज्ञानाचं आणि बातम्या देणारं साधन असायचं. दिवसातून फक्त काही ठराविक तास कार्यक्रम असणाऱ्या रेडिओवर जुनीनवी गाणी ऐकायला मिळत आणि घरोघरी रेडिओ दिवसभर आणि रात्री साडेदहापर्यंत कायम चालू असल्यानं मग ही गाणी ओठांवर यायची आणि लक्षातसुद्धा राहायची.
त्याशिवाय दर बुधवारी रात्री आठ वाजता सुरु होणारा अमिन सयानी यांचा 'बिनाका गीत माला' हा कार्यक्रम नवनवी गाणी लोकप्रिय करत असे. यामुळं त्यावेळी सतत ऐकलेली गाणी आजही ओठांवर येणार यात आश्चर्य कसलं ?
काही बाबी, घटना आणि व्यक्ती आपल्या स्मृतीत अगदी घट्ट बदलेल्या असतात. कितीही वर्षांचा काळ उलटला तरी आपल्या आठवणीतून या घटना आणि व्यक्ती नाहीशी होत नाहीत.
खरं पाहिलं तर आपल्या जीवनात हर घडीला सातत्यानं किती तरी घटना घडत असतात आणि कितीतरी लोकांना आपण सामोरं जात असतो. मानवी मेंदूत या सर्व घटना आणि व्यक्तींना साठवून ठेवणे, त्यांना कायम आठवणीत ठेवणं शक्यच नसतं आणि गरज सुद्धा नसती.
काल सकाळी नाश्त्याला काय खाल्लं होतं, दिवसभर कुणाकुणाशी काय बोलणं झालं हे सर्व कायम आठवणीत ठेवण्याची गरजच काय?
त्यामुळे मग ठराविक घटना आणि आणि व्यक्ती आपला मेंदू स्मरणात ठेवतो आणि कधीकाळी स्मृतीमधून बाहेर काढून आपल्यासमोर ठेवतो. कालांतराने यापैकीसुद्धा अनेक प्रसंग कायमस्वरूपी स्मृतींतून नाहीसे होतात. गरज नसलेला फाफटपसारा आणि नुसतीच अडगळ होऊन बसलेल्या आठवणी कायमस्वरुपी बाद होतात.
मोजक्याच काही आठवणी त्या व्यक्तीला काही वर्षांनीं आणि दशकांनी सुद्धा आठवतात, जसं काही शाळेतील काही मित्र आणि शिक्षक आणि एखाददुसरा प्रसंग.
मानसशास्त्र असं सांगतं कि विशिष्ट घटना आणि व्यक्तीच तुम्हाला आठवतात याचं कारण म्हणजे या घटनांनी आणि व्यक्तींनी तुमच्या आयुष्यात केलेला बरावाईट खोल परिणाम, या घटना दुःखद असू शकतील व सुखद असू शकतील मात्र त्या घटनांनी तुमच्या जीवनाला एक कलाटणी दिलेली असते, त्यामुळं तुमच्या स्मृतीच्या कप्प्यात त्यांना कायमची जागा मिळते.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात प्रसिद्ध चित्रकार गोपाळराव देऊस्कर जर्मनीत गेले होते. त्यांना तिथे एके ठिकाणी खूप मोठी सभा दिसली. ते तिकडे गेले तर सैनिकी गणवेशातला एक माणूस अतिशय आक्रमकतेने भाषण देत होता.
तो चक्क पॉल जोसेफ गोबेल्स होता, हुकूमशहा अडॉल्फ हिटलरचा प्रचारप्रमुख.
आपल्याकडं जसं चाणक्यनिती म्हटलं जात तसंच या गोबेल्सनं राबवलेलं धोरण गोबेल्सनिती म्हणून प्रसिद्ध आहे. कुठलीही एक गोष्ट - मग ती खोटी असली तरी रेटून आणि सतत सांगितली कि ती असत्य घटना लोकांना सत्य वाटू लागते हा या गोबेल्स नितीचा सार.
त्यानंतर `गोबेल्स ऐकलेला माणूस’ असं विशेषण देऊस्कर यांना माजी न्यायाधीश मृदुला भाटकर यांनी आपल्या एका लेखात लावलं आहे. देऊस्कर यांच्या स्मरणात गोबेल्स कायम राहिला असणार याबद्दल शंकाच नको.
नुसतं गोपाळराव देऊस्कर असं म्हटलं तर या व्यक्तिमत्वाविषयी कदाचित अनेकांना चटकन उलगडा होणार नाही. पुण्यातल्या बालगंधर्व थिएटरमध्ये बालगंधर्व यांची दोन पोर्ट्रेस लावली आहेत. `अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटात हे पोट्रेस अगदी सुरुवातीच्या भागात दाखवतात.
तर बालगंधर्वांची पुरुष आणि स्त्रीवेषांतील ही दोन्ही पोर्ट्रेस गोपाळराव देऊस्कर यांनीच केली आहेत.
तुमच्यापैकी अनेकांच्या आठवणीत अशोक सराफ, सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे यांची भूमिका असलेल्या `अशी ही बनवाबनवी' या गाजलेल्या चित्रपटातले काही प्रसंग किंवा बालगंधर्व थिएटरमध्ये असलेले बालगंधर्वाच्या त्या दोन पोट्रेसनी असंच कायमच घर केलेलं असेल.
अशोक सराफ, सचिन पिळगावकर आणि लक्ष्मीकांत बर्डे यांची आपण अनेक चित्रपट पाहिलेले असतात, मात्र `अशी ही बनावबनवी' सारखे काही मोजकेच चित्रपट आपल्या आठवणीत कायम असतात हे विशेष.
काही वर्षांपूर्वी गोव्यात घडलेला हा प्रसंग. बायको आणि मुलीबरोबर फेरीबोटने प्रवास करत होतो. गोव्यात आजही अनेक छोटोमोठी बेटे आहेत कि जिथं येण्याजाण्यासाठी फक्त फेरीबोटचा पर्याय असतो. शोराव कि दिवार अशा कुठल्यातरी बेटावरुन परत येताना फेरीबोटमध्ये आपल्या सशस्त्र अंगरक्षणकांसह उभ्या असलेल्या एका वयस्कर व्यक्तीला पाहिलं आणि मी चमकलो.
त्यांना पहिल्यांदाच प्रत्यक्ष पाहत असलो तरी ते कोण आहेत हे कुणी सांगायची मुळी गरज नव्हती.
ऐंशीच्या दशकात अशांत पंजाब राज्यात अतिरेक्यांच्या कारवायांचा यशस्वीपणे पुरेपूर बिमोड करणारे भारतातले ते `सुपरकॉप' ज्युलिओ रिबेरो होते. त्यामुळे त्यांना कायम सुरक्षा पुरवली जात असते. पोलीस सेवेतून निवृत्त झाल्यानंतर रुमानिया या देशात भारताचे राजदूत असताना त्यांच्यावर प्राणघातक हल्लाही झाला होता.
रिबेरो यांना त्या दिवशी असं अगदी जवळून प्रत्यक्ष पाहिलं त्या घटनेस काही वर्षे झाली आहेत. मात्र कधीही या पोलीस अधिकाऱ्यांचं नाव वाचलं कि फेरीबोटमधली त्यांची ती छबी हमखास डोळ्यांसमोर झळकते.
काही मोजक्याच व्यक्ती आणि मोजकेच प्रसंग जसे आपल्या कायम स्मरणात राहतात अगदी तसंच काही कलाकृतींच्या बाबतीत होत असतं. शालेय जीवनापासून आपण अनेक पुस्तकं वाचत असतो अनेक चित्रपट पाहत असतो अनेक चित्रं आणि शिल्पा पाहत आलेलो असतो. मात्र यापैकी काही ठराविकच पुस्तकं चित्रपट किंवा चित्रपटातील काही प्रसंग मनात कायम घर करून असतात.
वि स खांडेकर यांच्या ययाती’ कादंबरीला ज्ञानपीठ मिळालं तेव्हा सत्तरच्या दशकात मी ही कादंबरी अधाशाप्रमाणे वाचून काढली होती. त्यावेळी मी दहावीला होतो. आज पाच दशकांच्या कालावधीनंतर आजही या कादंबरीचे कथानक, त्यातली ययाती, शुक्रांची कन्या देवयानी, राजकन्या शर्मिष्ठा, कच आणि पुरु ही पात्रे माझ्या स्मरणात आहे.
रणजित देसाई यांच्या `स्वामी’ वगैरे कादंबऱ्या पू ल देशपांडे यांच्या अनेक पुस्तकातली पात्रे आजही अजूनमधून नजरेसमोर येत असतात.
रोम येथे सहलीवर असताना व्हॅटिकनमधल्या सेंट पिटर्स बॅसिलिकात मायकल अँजेलो यांनी साकारलेले अप्रतिम `ला पिएता’ हे संगमरवरी शिल्प तर मी कधीही विसरू शकणार नाही.
आपण सर्वांच्या आयुष्यांत घडलेल्या प्रसंगाची, अनुभवलेल्या घटनांची, आणि भेटलेल्या व्यक्तींची स्मरणचित्रे आपल्या मनात कायमची कोरलेली असतात. त्यातील काही दुःखद घटनांतील दुःखाची तीव्रता काळाच्या औषधांनी कमी केलेली असते, आनंददायी, सुखद घटना मात्र कायम आनंद देत असतात.
जीवनात सुखीसमाधानी राहण्यासाठी यापैकी कुठल्या आठवणींना सतत गोंजारत राहायचे आणि कुठल्या आठवणी कायमच्या दूर लोटायच्या हे आपल्या हातात असते.
आणि त्याहून सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुठल्याही कडुगोड आठवणींत न रमता वर्तमानकाळातच जगलं तर अधिक चांगलं !