Did you like the article?

Showing posts with label Lokmanya Vachanalaya. Show all posts
Showing posts with label Lokmanya Vachanalaya. Show all posts

Tuesday, November 30, 2021

साहसी, रहस्य कथांच्या मालिकेचे लेखक गुरुनाथ नाईक

सत्तरच्या दशकात श्रीरामपूरच्या चतु:सीमा खूप मर्यादित होत्या. बेलापूर रोडच्या टोकाला असलेला टांगा स्टँड आणि त्यासमोरची वसंत टॉकीज ही शहराची एक सीमा, संगमनेर रोडवरचा नाका ही दुसरी सीमा, तिकडे नेवाश्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेली मॉडर्न हायस्कुल एक सीमा तर रेल्वेखालून जाणाऱ्या भुयारी पुलानंतरची निर्वासित कॉलनी आणखी एक सीमा असायची. मेनरोड हा शहराचा मध्यवर्ती आणि गजबजलेला भाग आणि या रस्त्याच्या अगदी मध्याला असलेली किशोर टॉकीज, शिवाजी रोडला जोडणाऱ्या शेजारच्या बोळातले पोस्ट ऑफिस हे शहराचे हृदयस्थान होते.

या किशोर टॉकीजशेजारी रस्त्यावर विविध व्यवसाय करणाऱ्यांच्या हातगाड्या होत्या आणि रस्त्याच्या पलिकडे सार्वजनिक कार्यक्रमाचे ठिकाण असलेले आझाद मैदान आणि मैदानाला लागून नव्यानेच स्थलांतर झालेले श्रीरामपूर नगरपालिकेचे लोकमान्य टिळक वाचनालय होते.
या किशोर टॉकीजविषयी काही आठवणी मनात खोलवर साठवल्या आहेत. एक म्हणजे नवीन पिक्चर लागल्यावर शुक्रवार ते रविवारी तेथे `तीन का पाच', `पाच का दस' असे गर्दीतून बडबडत जाणारे शर्टची कॉलर वर असणारे ती सिनेमा तिकिटांचा काळाबाजार करणारी ब्लॅक मार्केटवाली तरुण पोरं आणि काचेच्या गोळ्या असलेल्या लिंबू सरबत विकणाऱ्यांच्या त्या हातगाड्या. तिथं दोन गटांत मारामारी झाली की या सोडा बॉटलच्या काचेच्या बाटल्या सर्रासपणाने मुबलक स्वरुपात वापरल्या जायच्या आणि नंतर त्या दोन्ही पार्ट्या फुटलेल्या बाटल्यांचे पैसे म्हणजे नुकसानभरपाई त्या हातगाडीवाल्याला इमानदारीने देत अशी एक ख्याती होती.
श्रीरामपुरातल्या जुन्या वसंत टॉकीज आणि रेल्वे पुलापलिकडच्या `राम और श्याम’ या चित्रपटाने नव्यानेच सुरु झालेल्या लक्ष्मी टॉकीजच्या आठवणीबाबत नंतर कधी तरी लिहीन.
तर लोकमान्य टिळक वाचनालय त्याकाळात सुद्धा महाराष्ट्रातील सर्वांत नामांकित सार्वजनिक वाचनालय होते, शहरातील सुशिक्षित आणि उच्चभ्रू वर्गातील लोकांची या वाचनालयात नेहेमी ये-जा असायची.
लोकमान्य टिळक वाचनालयातला दैनिके आणि मासिके वगैरे नियतकालिकांचा विभाग सर्वांसाठी खुला असायचा, मात्र तिथला पुस्तकांचा आणि ग्रंथांचा विभाग वाचनसंस्कृतीतील अगदी गाभाऱ्यासारखा असायचा. तिथे काही मोजक्याच लोकांचा वावर असायचा आणि या विभागातील संदर्भग्रंथ वगळता बाकीची पुस्तके, ताजी मासिके आणि दिवाळी अंक वाचण्यासाठी घरी नेण्यासाठी या ठराविक लोकांना मुभा असायची.
हे लोक म्हणजे या वाचनालयाची अनामत रक्कम भरुन वार्षिक वर्गणी नियमितपणे भरणारे वर्गणीदार. अशा वर्गणीदारांची संख्या त्यावेळी खूप मर्यादित असायची, याचे कारण म्हणजे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असलेली अनामत रकम, वार्षिक वर्गणी आणि वर्गणीदार होण्यासाठी काही मान्यवरांची आवश्यक असलेली शिफारसपत्रे. वाचनालयातून बाहेर गेलेले पुस्तक यदाकदाचित परत येणारही नाही या भितीपोटी या पुस्तकांभोवती केलेला हा कडेकोट बंदोबस्त केलेला असायचा.
या किचकट अटींमुळे सातवी-आठवीत शिकताना इच्छा असूनही मला या वाचनालयाचे वर्गणीदार बनता आले नाही. मात्र त्यामुळे माझ्या वाचनप्रेमावर गदा आली असे म्हणता येणार नाही. कारण शाळा संपली कि या वाचनालयात मी पडिक असायचो, तिथली सर्व जिल्हापातळीवरची आणि राज्यपातळीवरची दैनिके आणि नियतकालिके पूर्ण वाचुन काढायचो आणि नंतर मग तिथल्याच लाकडी टेबलांवर ठेवलेली विविध साप्ताहिके आणि मासिके वाचत बसायचो.
या वाचनालयात संघ्याकाळी मुलांसाठी वेगळा वाचन विभाग खुला असायचा, तिथे चांदोबा, कुमार, सारखी मासिके आणि छोट्यांसाठी इतर कितीतरी रंगीबेरंगी चित्रे असलेली पुस्तके असायची. मुलांसाठी असा वाचनाचा खजिना मी त्यानंतर कुठेही पाहिला नाही. दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत तिथे साने गुरुजी कथामाला या उपक्रमांतर्गत पुण्या - मुंबईच्या मोठमोठ्या साहित्यिकांची व्याख्याने असायची.
दरम्यान याच काळात पुस्तकांचे एक वेगळेच, अनोखे विश्व असते असा मला अचानक शोध लागला. लुईस आणि योसेफ हे माझे दोन थोरले भाऊ टिळक वाचनालयाच्या समोरच आणि किशोर टॉकीजच्या शेजारी असलेल्या एका हातगाडीवर असलेल्या पुस्तकांच्या थप्पीतून काही पुस्तके नियमितपणे वाचण्यासाठी घरी आणत असत आणि वाचल्यानंतर ती पुस्तके परत देऊन दुसरी आणायचे.
हातगाडीवरचे हे वेगळ्या स्वरुपाचे वाचनालय होते, इथली वर्गणी माफक होती, दर दिवसाला मला वाटते पाच पैसे प्रत्येक पुस्तकासाठी द्यावे लागायचे आणि दोन दिवसांत पुस्तक परत न दिल्यास दरदिवसाला दंड बसायचा या वाचनालयात दिवसभर वाचकांची वर्दळ असायची, गुलशन नंदा या लेखकाच्या रंगीत कव्हरच्या हिंदी कादंबऱ्याही तेथे असायच्या. शिवाय आंबटशौकीन वाचकांसाठी रंगीत कव्हरची छोटीछोटी पुस्तिका कुठेकुठे लपून ठेवलेली असायची, विशिष्ठ वर्गणीदारांना ती पुस्तिका मिळायच्या हेही माझ्या लक्षात आले.
या हातगाडीवरुन भावाने आणलेले एक पुस्तक एकदा माझ्या हातात पडले आणि मी वाचायला लागलो तो ते पुस्तक हातावेगळे करुनच थांबलो.
पॉकेटबुक आकाराच्या आणि काळपट रंगाचा कागद असलेल्या त्या पुस्तकाची एकूण पाने असावीत पन्नास- साठ . मात्र लोकमान्य टिळक वाचनालयात मी वाचायचो त्या साप्ताहिकातील आणि मासिकातील लिखाणापेक्षा हे खूप वेगळे होते. या प्रत्येक पुस्तकाचा विषय, लेखनशैली आणि नायक अगदी वेगळ्या धर्तीचे होते, आणि लेखनशैली वाचकांना खिळून ठेवणारी होती. वेळ मिळेल तसे वाचण्यासारखी ही पुस्तके नव्हती, पहिल्या पानापासून वाचायला सुरुवात केल्यावर कुठल्याही कारणांमुळे ते पुस्तक अर्धे वाचून खाली ठेवणे अवघड असायचे.
या पुस्तकांच्या लेखकाचे नाव गुरुनाथ नाईक असे आहे हे लक्षात आले. या लेखकाच्या अशाच जुन्या पुस्तकांची थप्पी त्या हातगाडीवर रचून ठेवलेली असायची आणि लोक त्यापैकी एखादे पुस्तक निवडून वाचण्यासाठी घरीं नेत असत.
त्यानंतर गुरुनाथ नाईक यांची पुस्तके वाचण्याचा मी सपाटा लावला, भावाऐवजी मीच त्या हातगाडीकडे जाऊन मला पाहिजे ती पुस्तके आणू लागलो, दुसऱ्या दिवशी ते पुस्तक परत देऊन दुसरे पुस्तक आणू लागलो.


या पुस्तकांचे लेखक गुरुनाथ नाईक असले तरी पुस्तकाच्या मालिकांचे नायक वेगळे असायचे, प्रत्येक मालिकेतील विषय, पार्श्वभूमी, भौगोलिक संदर्भ तसेच ऐतिहासिक परिस्थिती अगदी वेगळी असायची, त्या अनुरुप भाषा आणि शब्दभांडार असायचे. एका मालिकेच्या पुस्तकात भारत -पाकिस्तान संघर्षाची, हेरगिरीची पार्श्वभूमी असायची. या पुस्तकात भारत पाकिस्तान सीमेवरचा आणि काश्मिरचा तपशील असायचा. तर दुसऱ्या एका मालिकेत ऐतिहासिक, मद्ययुगीन पार्श्वभूमी असायची, इथे घोडेस्वारी, तिरंदाजी आणि तलवारबाजी असायची.
कॅप्टन दीप, मेजर अविनाश भोसले, शिलेदार, धुरंदर हे या पुस्तकांचे नायक. आज साडेचार दशकांच्या कालावधीनंतर गुरुनाथ नाईकांच्या रहस्यकथांची कथानके आठवत नाहीत, मात्र कॅप्टन दीप, धुरंधर आणि शिलेदार ही नावे ऐकली कि या रहस्यकथांमधले नायक मात्र त्यांच्या वेगवेगळ्या कालखंडातल्या पोषाखांत लगेच डोळ्यांसमोर उभे राहतात.
मला आठवते काही ठराविक कालावधीनंतर गुरुनाथ नाईक यांच्या मालिकांच्या नव्या पुस्तकांचा संच यायचा, बहुधा तो दिवस शुक्रवार असायचा. त्यामुळे शुक्रवारी संध्याकाळी आणि शनिवारी ही नवी पुस्तके घेण्यासाठी वर्गणीदारांची गर्दी असायची. त्याकाळात रंगतदार साहित्य देणारी स्वराज्य. श्री मार्मिक वगैरे मराठी साप्ताहिके खूप लोकप्रिय असायची. ही साप्ताहिके सुद्धा शनिवारी स्टॉलला लागलेली असायची.
इतक्या छोट्या कालावधीत गुरुनाथ नाईक हा लेखक इतकी पुस्तके कशी लिहितो असे त्या लहान वयातसुद्धा मला नवल वाटायचे, आजही वाटते.
लोकमान्य टिळक वाचनालयाच्या वाचकांपेक्षा आणि वर्गणीदारांपेक्षा हातगाडीवरच्या या वाचनालयाचा वाचक आर्थिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या आणि अभिरुचीच्या दृष्टीने खूप वेगळा होता. लोकमान्य टिळक वाचनालयाचा वाचक हा उच्चवर्गिय आणि मध्यमवर्गिय असायचा, वैचारिक स्वरुपाचे लिखाण वाचणारा, चित्रपट आणि नाटके पाहणारा रसिक मनोवृत्तीचा होता, तर हातगाडीवरची पुस्तके वाचणारा वाचक मध्यमवर्गिय आणि वाचन, चित्रपट आणि नाटके याबाबत फारशी अभिरुची नसणारा होता. या श्रेणीतील वाचकांना खिळून ठेवण्याची हातोटी या पुस्तकाचे लेखक गुरुनाथ नाईक यांना लाभली होती.
विशेष म्हणजे नाईक यांच्या कुठल्याही मालिकेतील पुस्तकांचा विषय आणि मजकूर हीन अभिरुचीचा नसायचा. या स्तरातील वाचकांची वाचनसंस्कृती जोपासण्याचे, या संस्कृतीला उत्तेजन देण्याचे फार मोठे काम गुरुनाथ नाईक यांनी केले.
गुलशन नंदा यांच्या हिंदी कादंबरींप्रमाणेच गुरुनाथ नाईक यांच्या पुस्तकांच्या या मालिकांना सरकारी अनुदाने मिळत असणाऱ्या लोकमान्य टिळक वाचनालयासारख्या कुठल्याच वाचनालयात आणि ग्रंथालयांत मुळीच स्थान नव्हते. कदाचित ही पुस्तके या वाचनालयात आणि ग्रंथालयांत ठेवणे स्वतःस सुसंस्कृत समजणाऱ्या लोकांच्या उच्च अभिरुचीस साजेसे नसावे.
गोव्यात गेल्यानंतर तेथे पत्रकार म्हणून काम करताना एकदा संघ्याकाळी मंद दिव्यांच्या प्रकाशात झालेल्या एका पत्रकार परिषदेत एका सहकारी पत्रकाराने समोर खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीची ओळख करुन दिली, '' हे गुरुदास नाईक, मराठीतल्या अनेक साहसी, रहस्य कथांच्या मालिकेचे लेखक. यांचे नाव तू ऐकले असणार आणि पुस्तकेसुद्धा वाचली असशील. ''
ती ओळख करुन दिल्यावर मला बसलेला आश्चर्याचा धक्का मला आजही आठवतो. दोनचार जुजबी वाक्यांची देवाणघेवाणसुद्धा झाली.
पत्रकारांना एके काळी त्यांची दैवते असणाऱ्या अशा खूप व्यक्तींना अचानक सामोरे जाण्याचे असे प्रसंग अनेकदा येत असतात. अशांपैकी एक असलेला हा प्रसंग माझ्या आठवणीत राहिला.
आपल्या पुस्तकांच्या कमाईतून श्रीमंती मिळवणारे एक मराठी लेखक म्हणून गुरुनाथ विष्णू नाईक यांना ओळखले जाते. मात्र कुणास ठाऊक नंतर या लेखकावर आर्थिक संकट कोसळले असे काही वर्षांपूर्वी ऐकले. वृदापकाळात त्यांना आर्थिक मदत करावी असे आवाहनसुद्धा करण्यात आले होते.
सामान्य मराठी वाचकांना आगळ्यावेगळ्या तऱ्हेचे साहित्य वाचायला देऊन त्यांना वेगळ्या विश्वांत सहल घडवून आणण्याचे काम या लेखकाने केले. विनोदी लेखकाला साहित्यविश्वात प्रतिष्ठा आणि मान मिळत नसतो, तीच बाब रहस्य आणि साहसी कथालेखकांचीही असते.
गुरुनाथ नाईक यांच्याआधी रहस्यकथा लेखक बाबुराव अर्नाळकर यांना कमालीची लोकप्रियता लाभली. बाबा कदम, सुहास शिरवळकर, चंद्रकांत काकोडकर, या लेखकांच्याही पुस्तकांवर वाचकांच्या उड्या पडत असायच्या.
मराठी साहित्य हा काही माझा प्रांत नाही आणि मराठी साहित्य समिक्षण तर अजिबात नाही. तरी पण मला वाटते या लेखकांनी मराठी समाजाच्या चारपाच पिढ्यांची वाचनाची भूक भागवली, त्यांची वाचनसंस्कृती जपवली. मात्र मराठी सारस्वतात त्यांची दखलही घेतली जात नाही, त्यांना अनुल्लेखाने मारले जाते हे मी अनेकदा अनुभवले आहे.
पुण्यात नव्वदच्या दशकात एका अखिल भारतीय साहित्य संमेलनात असेच बाबा कदम यांची कुणीतरी आम्हा पत्रकारांना ओळख करुन दिली. मी पत्रकारांसाठी असलेल्या कक्षात बसलो तेव्हा हा सर्वाधिक लोकप्रिय लेखक त्यावेळी प्रेक्षकांत मात्र (पहिल्या रांगेत!) बसला होता हे पाहून बसलेला धक्का मी आजही विसरलेलो नाही.
मात्र या रहस्यकथा लेखकांना सन्मानाचे, प्रतिष्ठिचे स्थान कधीही मिळाले नाही. साहित्यातले पुरस्कार किंवा इतर मानमरातब दूरच राहिले.
वाचकांमध्ये ते कितीही लोकप्रिय ठरले तरी या रहस्यकथा लेखकांचे साहित्य उच्च अभिरुचीचे गणले जात नाही. त्यात बहुधा जीवनाची तत्वे वा चिरंतन मूल्ये नसल्याने या करमणूक प्रधान लिखाणाला साहित्य म्हणून स्थान दिले जात नसावे. त्यामुळे त्यांना साहित्य पुरस्कार वगैरे मिळत नाहीत. गुरुनाथ नाईक यांचेही असेच झाले.
गुरुनाथ नाईक यांच्या निधनानंतर जुन्या पिढीतील अनेक वाचकांनी सोशल मीडियामद्ये त्यांना आदरांजली वाहिली आणि जनमानसातले त्यांचे स्थान अधोरेखित केले.
प्रतिष्ठित प्रिंट मीडियातील किती दैनिकांनी आणि नियतकलिकांनी दखल घेऊन या एकेकाळच्या अत्यंत लोकप्रिय लेखकाचा सन्मान केला हे मला माहित नाही.
गोव्यातल्या राजू बी. नायक संपादक असलेल्या दैनिक `गोमंतक’ मध्ये प्रभाकर ढगे यांनी अगदी विस्तृत लेख लिहून गुरुनाथ नाईक यांच्या व्यक्तिमत्वाविषयी आणि साहित्याविषयी लिहिले आहे. तो लेख वाचून गुरुनाथ नाईक यांच्या त्या पॉकेट बुक्समधील अनेक नायक आणि त्यांच्या चित्तथरारक कामगिऱ्या नजरेसमोर उभ्या राहिल्या.
गुरुनाथ नाईक यांच्या साहित्यिक कामगिरीला माझा मानाचा मुजरा !