Did you like the article?

Showing posts with label Enjoyment. Show all posts
Showing posts with label Enjoyment. Show all posts

Wednesday, July 19, 2023

 भवताल प्रत्येक क्षणाचा, प्रसंगाचा मनसोक्त, समरसून आस्वाद


पुर्व युरोपातल्या बल्गेरियात एका गावाच्या भेटीवर होतो. त्या गावाला भेट देण्याचं एक महत्त्वाचं कारण होतं.

वाहत्या पाण्याच्या प्रवाहाचा कल्पकतेनं वापर करून तिथल्या गावकऱ्यांनी विविध लघु कुटिरोद्योग सुरु केले

होते. गावातून एक मोठा ओढा जात होता. त्या ओढ्याच्या पाण्याचा या लोकांनी यासाठी वापर केला होता.

एका ठिकाणी पाणी वाहत येत होतं तसं तिथं त्या प्रवाहाचा वापर करुन वेगवेगळ्या कुंभारकामासाठी

लाकडी चाकं फिरायची. तिथला कुंभार किंवा कारागीर पाण्याच्या वेगाने गरागरा फिरणाऱ्या चाकाच्या

मदतीनं मातीच्या चिखलाला विविध आकार द्यायचा. त्या वेळी छोट्यामोठ्या आकाराचे माठ वगैरे घरघुती

भांडी आकार घेताना पाहून नवल वाटलं. तसं कुंभारकाम मी अनेकदा पाहिलं होतं पण वाहत्या पाण्याच्या

वेगाचा वापर करून होणारं हे कुंभारकाम अचंबित करणारं होतं. अगदी असाच प्रकार दुसऱ्या ठिकाणी

सुतारकामात दिसला. तिथं त्याच वाहत्या पाण्याच्या वेगाचा वापर लाकूड कापण्यासाठी, लाकडाला आकार

देऊन त्यापासून विविध वस्तू बनवण्यासाठी केला जात होता. अशा प्रकारे तिथं लोहारकाम आणि इतर

कितीतरी पारंपरिक व्यवसाय चालत होते. आणि या कल्पकतेवर आधारीत कामांमुळे ते गाव एक पर्यटनस्थळ

बनून चांगली आर्थिक कमाई पण करत होते.


ही घटना तशी खूप वर्षांपूर्वीची. त्या घटनेच्या वेळी मी ती कलाकुसर पाहण्याचा पुरेपूर आस्वाद घेतला.

त्याऐवजी मी फोटो घेत बसलो असतो किंवा व्हिडिओ शूटिंग करत बसलो असतो तर कदाचित आता माझ्याकडे

इतरांना दाखवण्यासाठी खूप फोटो किंवा व्हिडीओ असते. मात्र ते पाहण्याच्या प्रत्यक्ष आनंदाला मी नक्कीच

मुकलो असतो. त्या गावातली ती कला आणि पाण्याचा अत्यंत नावीन्यपूर्ण वापर मला आजही आनंद देतो याचं

कारण त्यावेळी मी त्या प्रसंगाचा त्यावेळी पुरेपूर आस्वाद घेतला होता.


आणि ही दुसरी अगदी अलिकडची घटना, मागच्या शनिवारची . संध्याकाळीच अचानक बाहेर, हॉटेलात जेवायला

जायचं असं आम्हा दोघा नवरा-बायकोचं ठरलं. एक-दिड तास त्या हॉटेलात निवांतपणे बोलण्यात आणि

खाण्यापिण्याच्या आस्वाद घेण्यात गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी मला आठवलं, काही तरी करण्याचं आम्ही दोघं

पार विसरलोच होतो. नंतर मला एकदम हसू आलं. त्या हॉटेलात आम्हा दोघांचे  जेवण सुरू होण्याआधी, आम्ही

ऑर्डर केलेल्या खाद्य पदार्थांचे आणि तिथल्या एकूण वातावरणाचे मोबाईलवर  फोटो आणि सेल्फी घेण्याचे

आम्ही चक्क विसरलोच होतो. पण लगेचच लक्षात आलं, आम्ही दोघांनाही ही घोडचूक केली होती  याचा अर्थ

आम्ही दोघांनीही हे असं एक दिवस बाहेर जाणं, हॉटेलात जेवणं, गप्पागोष्टी करणं मस्तपैकी एन्जॉय केलं होतं,

खरं कि नाही?


त्यादिवशी सकाळी हॉटेलात मी एकटा नाश्त्यासाठी गेली होतो. खाणार होतो पोहे किंवा उप्पीट, मात्र समोर

मांडलेले गोल, गरमागरम बटाटावडे दिसले आणि तोंडाला पाणी सुटलं. शेजारच्या भांड्यात लाल रस्सा

उकळत होता. लहानपणी श्रीरामपूर येथे घराशेजारीच असलेल्या `समाधान’ हॉटेलात लाल रश्श्यात निम्म्या

बुडालेल्या बटाटावड्यांवर आणि  बारीक चिरलेल्या कांद्यावर लिंबाची फोड पिळून मी खात असे, त्याची चव

आजही जिभेवर रेंगाळत असते. तर आता ऑर्डर दिल्यावर हॉटेल मालकाने एकाऐवजी दोन वडे प्लेटमध्ये दिले

होते, मात्र माझी काही तक्रार नव्हती. बटाटावडे रश्शात मस्तपैकी मिसळून त्यावर लिंबाची फोड पिळली

आणि  त्या पदार्थाचा छानपैकी आस्वाद घेतला. मुद्दाम काहीही घाई न करता  एकेक घास चवीनं खाल्ला 

आणि  खरंच खूप समाधान वाटलं. खाद्यपदार्थांचा असा आस्वाद घेणं आपल्याला क्वचितच जमतं याची यावेळी

जाणीव झाली.  

एखाद्या नेहेमीच्या गोष्टीचा किंवा कामाचा सुध्दा कधीकधी कंटाळा येतो किंवा ते काम रटाळवाणे बनते. मग  यातली मजा संपते आणि मग त्यातून अंग काढून घ्यावंसं वाटतं. बागकाम माझा एक आवडीचा छंद. काही दिवसांपूर्वी का कुणास ठाऊक मी माझ्या गच्चीवर माझ्या बागेकडे एकदम दुर्लक्ष केलं. काही दिवस बाहेरगावी, सिल्व्हासा येथे, गेलो होतो. परत आलो तेव्हा दिसलं कि काही नाजूक रोपटयांनी एकदम मान टाकली होती.  काही झाडं अजून तग धरून होती. नंतर अचानक माझं मन बदललं आणि पुन्हा एकदा दिवसांतून दोनदा या  झाडांना मी पाणी देऊ लागलो. तीनचार दिवसांपूर्वी मी पाणी घालत होतो आणि एकदम चमकलो. माझ्याकडे एक दहापंधरा वर्षांपासून एक रोपटे आहे. त्याचं नाव नाही माहित मला. पण कमळाच्या पाकळ्यांसारख्या पानांमुळे मला ते नेहेमीच आवडते. रोपट्याचे खोड आता निब्बर झालं आहे आणि पाणी घातलं नाही तरी दहापंधरा दिवस तग ठेवून धरण्याची क्षमता आहे. तर या. झाडाला पुन्हा पाणी देण्यास सुरुवात केली आणि आता एका वेगळ्याच गोष्टीनं लक्ष वेधून घेतलं, त्या रोपट्याच्या निब्बर खोडाला कुंडीतल्या मातीपासून थोडं वर चक्क एक कोवळा कोंब फुटला होता. ते पाहिलं आणि मला झालेला आनंद अवर्णनीय होता.

माझ्या या हरित मित्रांच्या साथीचा आस्वाद घेणं त्यांच्यात काही काळ रमणं याकडे मी दुर्लक्ष केलं याबद्दल वाईट वाटलं.  आता पुन्हा एकदा मी माझ्या या छोट्याशा बागेत दररोज रमतो आहे, माझ्या या हरित मित्रांची ख्यालीखुशाली घेतो आहे. त्यांच्याबरोबर काही क्षण घालवणं म्हणजे म्हणजे त्या दिवसाला रोपट्यांच्या पानाफुलांना आलेल्या टवटवीप्रमाणं आपल्या आयुष्यातल्या त्या दिवसालासुद्धा टवटवी येते हे माझ्या लक्षात आलं आहे.

टेलिव्हिजनवर चित्रपट किंवा एखादी मालिका पाहताना त्यात प्रत्येक वेळी आपण किती समरस होत असतो? माझी थोरली बहिण टेलिव्हिजनवर बातम्या, मालिकांमधले प्रसंग किंवा इतर कुठलेही कार्यक्रम पाहताना पूर्ण समरस होत असते याबद्दल मला नेहेमीच कौतुक वाटते. ती एकटी टेलिव्हिजनसमोर बसलेली असली तरी विनोदी प्रसंगांत ती तोंडाला पदर लावून खळखळून हसते. अधूनमधून ` अगं बया ! असे उद्गार काढत असते. वृत्तपत्रं वाचत असतानासुद्धा ती त्यातल्या बातम्यांशी अशीच एकरूप होत असते. असं कुठल्याही गोष्टीत आणि प्रसंगात पूर्णतः समरस होणं खूप कमी लोकांना जमतं.

टेलिव्हिजनवर किंवा मैदानातील क्रिकेट मॅच विशेषतः भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहताना प्रेक्षक किती समरस होत असतात. या सामन्यांत अनेकदा युद्धजन्य परिस्थिती असते हे सांगायलाच नको. वर्ल्ड फ़ुटबाँल कपासाठी आता चालू असलेल्या मॅचेसमध्ये जगभरातील फ़ुटबाँल चाहते याचा अनुभव घेत आहेत. काही दिवसांपूर्वी टी-२० क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियात मेलबर्न येथे भारताने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानविरुद्ध  सामना अत्यंत पराकोटीच्या प्रतिकूल स्थितीत जिंकला. त्या सामन्याच्या अंतिम क्षणी प्रेक्षकांबरोबर मैदानातली ही मॅच प्रत्यक्ष पाहत असलेले `लिट्ल मास्टर’ सुनिल गावसकर यांचा जल्लोष समाज माध्यमांवर अनेकांनी पाहिला असेलच. याला म्हणतात समरसून आस्वाद घेणे. जीवनाचा प्रत्येक क्षण जगताना आपल्याला असं समरस व्हायला जमायला हवं. हे सहजशक्य नाही हे उघड आहे मात्र त्यासाठी प्रयत्न करायला काय हरकत आहे?  

 कुठल्याही मंदिरात, तिर्थक्षेत्री गेल्यानंतर तिथे भावभक्तीने दर्शन घेण्याऐवजी तिथं स्वतःचे फोटो घेण्यातच अनेकांना अधिक रस असतो. सहलीसाठी एखाद्या सुंदर, निसर्गरम्य ठिकाणी गेलं कि तिथंही हाच प्रकार ! निसर्गात वावरताना, सहलीला गेल्यावर, आपण काय करत असतो हे स्वतःला विचारुन पहा. तिथल्या गोष्टींचा आस्वाद घेण्याऐवजी बहुसंख्य लोक आपल्या मोबाईलमध्ये फोटो आणि सेल्फीज घेण्यात दंग असतात. तीच गोष्ट मित्रांसमवेत, सहकाऱ्यांबरोबर एखाद्या कार्यक्रमाला आल्यावर घडते आणि तिथं खास भेटण्यासाठी, बोलण्यासाठी जमलेल्या त्या लोकांशी बोलायचे राहून जाते.

कढी हा माझ्या आवडीचा एक खाद्यपदार्थ. इतर ठिकाणचं मला माहित नाही पण आमच्या औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्यांत माझ्या लहानपणी कुठल्याही लग्नांत आणि इतर कार्यक्रमांत लापशी, शाक (म्हणजे वांगे आणि बटाट्याची भाजी ) या पदार्थांबरोबर कढी हा खाद्यप्रकार असायचाच. पत्रावळीत साध्या भातात गोल आळं केल्यावर त्यात कढी ओतली जायची. आजकाल आठवड्यातून एकदा तरी घरी मी दह्याची कढी करुन त्यात भजी टाकत असतो. काही खाद्यपदार्थांत अपायकारक तर काहींमध्ये उपयुक्त जिवाणू असतात. दह्यामंध्ये आंबवण्याची प्रक्रिया करणारे उपयुक्त जिवाणू असतात. तर काही दिवसांपूर्वी वाचलं कि दही उकळलं तर त्यात उपयुक्त असलेले जिवाणू बॅक्टेरिया मरतात आणि मग या कढीचा काही उपयोग नसतो. ते वाचून मी खट्टू झालो. एका ज्येष्ठ सहकाऱ्याशी हा विषय चर्चेत निघाला तेव्हा ते म्हणाले, ;''कामिल, तुला   कढी आवडते ना, मग विसरा कि हे सारं आणि मस्तपैकी कढीचा आणि भज्यांचा आस्वाद घ्या ! 

आस्वाद कसा घ्यावा याचा हा उत्तम वस्तुपाठ होता.


^^^^