बातम्यांचा पाठलाग करणाऱ्या पत्रकारांवर पाळत, सत्ताधारी पक्षाचे कान आणि डोळे असणाऱ्या गृहखात्याचे महत्त्व आणि गृहखाते मुख्यमंत्र्यांनी नेहेमी स्वतःकडे राखण्याचे कारण .......
गोव्यात पणजी येथें नवहिंद टाइम्सचा बातमीदार असताना माझ्याकडे गुन्हा आणि कोर्ट म्हणजे क्राईम आणि कोर्ट अशी एकमेकांशी निगडित असलेल्या दोन बिट्स होत्या. साधारणतः नव्याने कुणी बातमीदार म्हणून रुजू झाला कि सिंदबादच्या कथेप्रमाणे त्याच्या गळ्यात ही दोन्ही बिट्स अडकवून त्यापासून थोड्या सिनियर बातमीदारांनी मोकळे व्हायचे अशी त्याकाळात अनेक दैनिकांत पद्धत होती.
नवहिंद टाइम्समध्ये १९८०च्या दशकात मी नऊ वर्षे या दोन्ही बिट्स हाताळल्या, याचे एक कारण म्हणजे त्याकाळात मला ज्युनियर असलेला शिकाऊ बातमीदार आमच्या दैनिकात रुजू झालाच नाही. राहत्या घरी साधा लँडलाईन टेलिफोन नसताना आणि रात्री आठ ही आतल्या पानांसाठी बातमी स्विकारण्याची डेडलाईन असताना कुठल्याही गुन्ह्यांची आणि अपघातांची बातमी चुकू न देता क्राईम बिट सांभाळणे खरेच खूप अवघड आणि जोखमीचे काम होते.
मला आठवते त्यावेळी मूळचे गोव्याचेच असलेले एक पोलीस अधिकारी त्यावेळी सुपरिंटेंडंट ऑफ पोलीस होते तर शर्मा नावाचे एक आयजीपी होते.
त्यावेळी मांडवीच्या तीरावर असलेल्या मध्ययुगीन आदिलशहाच्या राजवाड्यात असलेल्या गोवा, दमण आणि दीवच्या दुमजली सचिवालयात खाली एका कोपऱ्यात प्रेस रुम होती. त्या प्रेसरुममध्ये येऊन वेगवेगळ्या संघटनांचे, राजकीय पक्षांचे आणि सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते आम्हा बातमीदारांना प्रेस नोट्स किंवा मंत्र्यांना आणि सरकारी अधिकाऱ्यांना त्यांनी दिलेली निवेदने देत असत.
अनेकदा यात पुढील आंदोलनांची माहिती किंवा धमकी दिलेली असायची. काही वेळेस खास बोलावलेल्या पत्रकार परिषदांत ही माहिती लेखी स्वरुपात दिली जायची, अनेकदा काही बाबी कागदावर न मांडता तोंडी स्वरुपात सांगितल्या जायच्या, आणि त्याच्यातच खूपदा खरी आणि मोठी बातमी असायची.
प्रेसरुममध्ये मी बसायला सुरुवात केली तेव्हाची ही गोष्ट आहे. सचिवालयाच्या वरच्या मजल्यावर पर्यटनमंत्री डॉ. विल्फ्रेड डिसोझा किंवा शिक्षणमंत्री हरिष झांटये यांची मुलाखत घेऊन आम्ही पत्रकार मंडळी लाल गालीचा असलेल्या लाकडी जिन्यावरून उतरुन प्रेस रुमकडे वळण्याआधीच एकदोन व्यक्ती काही सिनियर पत्रकारांना भेटत असत.
त्यांच्या देहबोलीवरुन आणि ते ज्या पद्धतीने पत्रकारांना बाजूला घेऊन संभाषण करत असत त्यावरुन मला ते कोण असावेत याविषयी विलक्षण कुतूहल वाटायला लागले. एकदोनदा पत्रकार परिषदांना सिनियर पत्रकार नव्हते अन त्यामुळे त्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधला तेव्हा मग मला सर्व उलगडा झाला.
आम्हा पत्रकारांकडून विशिष्ट पत्रके मागवून त्यातील मजकूर आपल्याकडील नोंदवहीत लिहून घेणारी, पत्रकार परिषदांत तोंडी सांगितली जाणारी माहिती विचारणारी सध्या वेषातील ते लोक एसआयबी म्हणजे स्पेशल इंटेलिजन्स ब्युरो या केंद्रिय गुप्तचर खात्याची तसेच स्पेशल ब्रांच म्हणजे सीआयडी (क्राईम इन्वेस्टिगेशन डिपार्टमेंट)ची लोक आहेत हे मला समजले तेव्हा पत्रकारितेत नविन असलेल्या मला धक्काच बसला होता.
नंतर कळाले कि पणजी शहरात आणि केंद्रशासित प्रदेशात विविध राजकिय पक्ष, विरोधी पक्ष, विविध सामाजिक आणि कामगार संघटना, विद्यार्थी संघटना, सत्ताधारी पक्षातील असंतृष्ट मंत्री वा आमदार काय करत आहेत, त्यांचे मोर्चा-आंदोलने, बंद दारातील बैठका किंवा खुल्या परिषदा वगैरे कधी होणार आहेत, याची इत्यंभूत माहिती केंद्र आणि राज्य सरकारकडची पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा सतत गोळा करत असते.
वृत्तपत्रांत बातम्या छापून येण्याआधीच किंवा ज्या गोष्टी वृत्तपत्रांत कधी छापूनही येणार नाही अशा सर्व हालचाली, घटना आणि वक्तव्ये यांची सत्ताधारी नेत्यांना माहिती असायला हवी, या यासाठी हा सर्व खटाटोप गुप्तचर यंत्रणा करत असतात.
गंमतीची गोष्ट म्हणजे या स्पेशल ब्रांच किंवा आयबीच्या कर्मचाऱ्यांकडे काही जण अगदी संशयाच्या नजरेने पाहत असायचे तरी सामाजिक, कामगार आणि इतर काही संघटनांमधली नेतेमंडळी मात्र त्यांच्याशी अत्यंत सौहार्दाचे संबंध ठेवून असायची.
मला आठवते गोव्यात विद्यार्थी संघटनांचे खासगी इंजिनियरिंग कॉलेजविरुद्ध आंदोलन चालू होते त्यावेळी ऑल गोवा स्टुडंट्स युनियनचे नेते असलेले सतीश सोनक वगैरे मंडळी या गुप्तचर यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांना स्वतः आपली प्रेसनोट्स देत असत. पत्रकार परिषद संपल्यानंतर सीपीआयचे कामगार नेते जॉर्ज वाझ यांनाही असेच प्रेसनोट्स देताना मी पाहिले आहे.
त्याकाळात राम्पणकारांचे नेते असलेले मथानी साल्डाना आणि ख्रिस्तोफर फोन्सेका यांच्या मागावर कायम सरकारी गुप्तकर यंत्रणा असायची. आम्हा पत्रकारांशी हे नेते बोलताना स्पेशल ब्रांचचे हे लोक आसपास घुटमळत असायचे, नंतर आम्हाला गाठून बोलण्याचा तपशील मागायचे.
आंदोलन, मोठ्या राजकिय व्यक्तीचा राजिनामा किंवा बंद दारांमागील गुप्त खलबते अशासारखी अत्यंत स्फोटक माहिती असल्यास पत्रकार आपल्या ऑफिसांत जाण्याआधीच संबंधित माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून मग ती मुख्यमंत्री वगैरे सत्ताधारी नेत्यांकडे पोहोचली जायची.
असेही व्हायचे कि अनेकदा सरकारी जासूसगिरी करणाऱ्या अनुभवी आणि कुशल कर्मचाऱ्यांकडे आम्हा पत्रकारांपेक्षा विस्तृत आणि अधिक विश्वासार्ह माहिती असायची !
गोव्यात मुख्यमंत्रीपदावर दीर्घकाळ राहण्याचा विक्रम करणाऱ्या प्रतापसिंह राणे यांनी १९८०च्या दशकात आपल्या आसनावरची मांड भक्कम ठेवली होती, त्यावेळी मुख्यमंत्रीपदावर कायम डोळा असणारे डॉ. विली डिसोझा यासारखे त्यांच्या मंत्रिमंडळातील काही सहकारी राणे यांच्या आसनाला सतत सुरुंग लावत बसायचे,
याकाळात दोतोर विली आणि इतर असंतृष्ट मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या होणाऱ्या गुप्त बैठकांवर, त्यांच्या सततच्या दिल्लीवारींवर तसेच काँग्रेस श्रेष्ठींनी पाठवलेल्या आर. एल. भाटिया, जी के मूपनार आणि रवी वायलर या पक्ष निरीक्षकांच्या भेटीगाठींवर लक्ष ठेवायचे काम पत्रकार करायचे आणि गुप्तचर यंत्रणाही.
या भेटींत कुणी काय सांगितले, काय शिजले, पक्षनिरीक्षकांनी कुणाला काय कानपिचक्या दिल्या, कुणाची नेतेपदी निवड होणार वगैरे माहिती गोळा करणे एकाहाती शक्य नसायचे.
अनेकदा मग समोरासमोर आल्यावर पत्रकार आणि गुप्तचर कर्मचाऱ्यांमध्ये गुफतगू व्हायचे, भरपूर हातचे राखून नोट्सची देवाणघेवाण व्हायची आणि अशाप्रकारे दोघेही एकमेकांच्या मदतीस यायचे.
याकाळात बर्डे नावाचे डेप्युटी सुपरिंटेंडंट ऑफ पोलीस (डीवाय एसपी) हुद्द्याचे गोवा पोलिसांचे पब्लिक रिलेशन्स ऑफिसर (पीआरओ) होते. पणजीतल्या आझाद मैदानासमोरच्या भव्य पोलीस मुख्यालयात पहिल्या मजल्यावर बसणारे बर्डे हे क्राईम ब्रांच आणि स्पेशल ब्रांच म्हणजेच सीआयडी खात्याचा कारभार पाहायचे.
दररोज त्यांच्याकडे गोव्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनचा अहवाल यायचा आणि त्याआधारे ते आम्हा क्राईम बिट्सच्या पत्रकारांसाठी एक दोन पानांची सायक्लोस्टाईल (फोटोकॉपी म्हणजे झेरॉक्सचा हा आधीचा अवतार) केलेली प्रेस नोट तयार करायचे.
साधारणतः संध्याकाळी पाचच्या नंतर मी बर्डेच्या केबिनमध्ये पोहोचायचो, तेव्हा त्यांची प्रेस नोट तयार होत असायची. त्यानंतर बर्डे मला पंधरावीस मिनिटे बसवून घ्यायचे आणि शहरात, गोव्यात काय चालले आहे, माझ्या संपर्कातील म्हणजे माझ्या बिट्समधील विविध कामगार, विद्यार्थी संघटनांत काय घडामोडी चालल्या आहेत याची ते विचारपूस करायचे.
सुरुवातीला मीही निरागसपणे त्यांना ही माहिती द्यायचो, माझी अपेक्षा अशी कि संभाषणादरम्यान त्यांच्याकडूनही मला काही बातम्या मिळाव्यात, काही स्कुप होतील अशा बातम्यांचे लीड मिळावे.
नंतर माझ्या लक्षात आले कि आमच्या संभाषणाची दिशा एकतर्फी असायची, त्यांच्याकडून मला त्या पंधरावीस मिनिटांत चहाबिस्किटे आणि ती प्रेसनोट याशिवाय काहीच मिळत नसायचे.
हेच बर्डे आठवडयात कधीतरी सकाळी किंवा कार्यालयीन कामानंतर आमच्या `नवहिंद टाइम्स’ दैनिकात वृत्तसंपादक एम. एम. मुदलियार यांना भेटायला यायचे. पन्नाशीच्या जवळपास आलेल्या या दोघांच्या अर्धा-एक तास विविध विषयांवर गप्पा व्हायच्या.
त्यावेळी मुदलियार यांच्याकडून मला कळाले कि गोव्यात चाललेल्या राजकीय आणि इतर घटनांचे हालहवाल जाणून घेण्यासाठी सीआयडीचे डिवाय- एसपी असलेल्या बर्डे यांच्या कामाचाच हा एक भाग होता.
याचकाळात मला गोवा क्राईम आणि सीआयडीचे अधिकारी असलेल्या बर्डे यांच्या एका वेगळ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या कामाचा भाग माझ्या लक्षात आला.
गोव्यातील दैनिकांसाठी क्राईमसंदर्भातील दैनंदिन प्रेसनोट तयार करण्याबरोबरच बर्डे दररोज त्यांच्या वरच्या दोन अधिकाऱ्यांसाठी म्हणजे क्राईम सुपरिंटेंडंट ऑफ पोलीस आणि आयजीपी यांच्यासाठी एक वेगळे, हायली क्लासिफाईड म्हणजे गुप्त स्वरुपाचे टिपण तयार करायचे.
त्यादिवशी चोवीस तासांत झालेल्या राजकीय आणि इतर विविध क्षेत्रांतील झालेल्या अत्यंत महत्त्वाच्या घडामोडींची अगदी संक्षिप्त स्वरुपात त्या टिपणात माहिती दिली जायची.
दरदिवशी रात्री ते क्लासिफाईड टिपण राज्याच्या गृहमंत्र्याकडे आणि मुख्यमंत्र्याकडे पोहोचले जायचे. अगदी याच कारणांसाठी गृहमंत्री हे खास करून मुख्यमंत्री स्वतःकडेच राखून ठेवत असतो. त्याकाळात गोव्याचे मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे हे गृहमंत्रीही होते.
अशा प्रकारे गोव्यासारख्या चिमुकल्या राज्यात त्या दिवशी काय घडले, कुठल्या मंत्र्यांनी पत्रकारांशी बातचीत केली, कुठला असंतृष्ट मंत्री वा आमदार कुणाला भेटला, कुणी दिल्लीकड़े कुच केले ही सर्व माहिती त्या कॅप्सूल स्वरुपात टिपणात असायची. भले, या टिपणाचा उपयोग होवो ना होवो, मात्र पुढेमागे त्या टिपणातील माहितीचा संदर्भ उपयोगी पडायचा .
रणजित देसाई यांच्या ‘स्वामी’ या कादंबरीत पेशवेकालीन हेरगिरीचा एक प्रसंग आहे. तुरुंगात असलेल्या राघोबादादा यांच्याशी बुद्धिबळ खेळत असताना ‘तुमचा राजा दोन घरे मागे घ्यावा’ असे बोलले जाते आणि त्याचे टिपण माधवराव पेशवे यांच्याकडे दिले जाते.
त्यानंतर पेशव्यांच्या मदतीला निघालेले नागपूरकरांचे सैन्य माघारी परतते. त्या वेळी त्या वाक्याचा अर्थ समजून माधवराव पेशवे संबंधितांवर योग्य ती कारवाई करतात.
आधुनिक काळातही अशा प्रकारे स्वपक्षीय मंत्र्यांवर, आमदारांवर, विरोधी पक्षांच्या नेत्यांवर नजर ठेवून अशाच प्रकारे टिपणे तयार केली जातात आणि ती सत्ताधाऱ्यांकडे, राज्यकर्त्यांकडे पोहोचवली जातात. योग्य वेळी आवश्यक ती कारवाईही केली जाते.
थोडक्यात सत्ताधारी पक्षाकडून सरकारी यंत्रणेचा पुरेपूर वापर करून आपल्या पक्षातील नेत्यांवर, तसेच विरोधी पक्षांच्या नेत्यांवरही टेहळणी केली जाते. स्वतःची सत्ता आणि स्थान जपण्यासाठी गुप्तचर यंत्रणांचा वापर केला जातो. आणि हे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही ठाऊक असते.
विरोधी पक्षांचे लोक सत्तेवर आल्यावर तसेच करतात. त्यामुळे आवश्यक ती काळजी घेऊन वागणे आणि बोलणे, हे पथ्य सर्वच राजकारणी आणि गुप्तचर यंत्रणांच्या रडारवर असलेले इतर लोक पाळत असतात.
सन १९९९ ते २०१४ या पंधरा वर्षांच्या काळात काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपदाच्या बदल्यात राष्ट्रवादीने गृहखाते आणि इतर महत्त्वाची खाते स्वतःकडे ठेवली होती,
आताही शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मात्र गृहखाते राष्ट्रवादीकडेच आहे. त्यामुळे गेली तीन-चार दिवस आपल्या राज्यात आणि राजधानीत काय घडत होते याचा राजाला पत्ताही नव्हता..