Did you like the article?

Monday, September 22, 2025

 

                                                       सायमन मार्टिन

यंदा फार जुनी परंपरा असलेल्या दोन साहित्य संमेलनांचे बार पुढील वर्षांरंभात लागोपाठ उडणार आहेत.
शतकाच्या उंबरठ्यावरचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे तर शंभर वर्षांची परंपरा असलेले मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन सायमन मार्टिन यांच्या अध्यक्षतेखाली नाशिकला नऊ ते अकरा जानेवारीला होणार आहे.
दोन्ही साहित्य संमेलनांचे पडघम वाजायला सुरवात झाली आहे.
`पानिपत'कार पाटील यांच्या अलिकडच्या आरक्षणाबाबतच्या एका विधानाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या निवडीबद्दल साहजिकच संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत.
असल्या वादांमुळेच खरे तर मराठी साहित्य संमेलनांत रंगत आणि मजा येते असे म्हटले जाते.
माझ्या आठवणीप्रमाणे वादाची ही गौरवशाली परंपरा घोषित आणीबाणीपर्वात कराड येथे दुर्गाबाई भागवत यांच्या अध्यक्षतेखाली आणि मावळते अध्यक्ष पुरुषोत्तम लक्ष्मण तथा पुल देशपांडे यांच्या उपस्थितीत झालेल्या 1975 सालच्या संमेलनापासून सुरु झाली आहे. असो.
तर मराठी ख्रिस्ती साहित्य परिषदेने आपल्या घटनेनुसार संमेलनाध्यक्षपदासाठी निवडणूक जाहीर करुन, इच्छूक उमेदवारांकडून रितसर अर्ज मागवून, त्यांच्या मुलाखती वगैरे असे सर्व सोपस्कार पार पाडून संमेलनाध्यक्षांची निवड जाहीर केली आहे.
बीड येथे झालेल्या सव्वीसाव्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे आणि परिषदेचे विद्यमान अध्यक्ष पौलस वाघमारे यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे.
वसईचे फादर विजय गोन्साल्विस अध्यक्षपदी असलेला नाशिक ख्रिस्ती साहित्य संघ नियोजित सत्ताविसाव्या संमेलनाचा यजमान आहे.
किमान दहा पुस्तके आपल्या नावावर असलेल्या व्यक्तीच यंदा संमेलनाध्यक्ष पदासाठी पात्र होत्या. याचे कारण एकही साहित्यकृती नसलेले लोक यापूर्वी संमेलनाध्यक्ष झालेले आहेत.
दुसऱ्या एका अलिखित संकेतानुसार यावेळचे साहित्य संमेलनाध्यक्षपद कॅथोलिक व्यक्तीसाठी राखीव होते. दोन वर्षानंतर होणाऱ्या संमेलनासाठी हे पद प्रोटेस्टंट साहित्यिकांसाठी राखीव असेल.
मार्टिन यांच्याव्यतिरिक्त यंदा दोन इतर साहित्यिक रिंगणात होते.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक हेमंत घोरपडे आणि वसई येथील आणि संध्या नागालँड येथे कार्यरत असलेले सालेशियन किंवा डॉन बॉस्को संस्थेचे फादर नेल्सन फलकाव यांनी या पदासाठी अर्ज दाखल केले होते.
निवड समितीने यापैकी मार्टिन आणि घोरपडे यांच्या मुलाखती घेतल्या, फादर फालकाव मुलाखतीसाठी दिलेल्या वेळेत येऊ न शकल्याने त्यांचा अर्ज बाद झाला होता.
मराठी साहित्य परिषदेने फादर फ्रान्सिस दिब्रिटो आणि डॉ जयंत नारळीकर यांच्याबाबतीतला अनुभव लक्षात घेऊन आता धट्टाकट्टा, चालताबोलता आणि हिंडूफिरु शकणारा संमेलनाध्यक्ष निवडण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे.
मराठी ख्रिस्ती साहित्य परिषदेनेसुद्धा यावेळी असाच निकष घेतला असावा.
ऐंशीच्या उंबरठ्यावरील घोरपडे यांना त्यांचे वय बहुधा प्रतिकूल ठरले. निवडणुकीचा आग्रह त्यांनी टाळल्याने राज्यातील पात्र मतदारांचा मात्र हिरमोड झाला असेल.
मराठी खिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाला एक वेगळेच वलय आहे.
सन १९२७ पासून नाशिक येथूनच सुरु झालेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद याआधी `स्मृतीचित्रे'कार लक्ष्मीबाई टिळक (नागपूर १९३३), प्रा. जयंतकुमार त्रिभुवन (कोल्हापूर १९८६), फादर फ्रान्सिस दिब्रिटो (पुणे १९९२), डॉ. सिसिलिया कार्व्हालो (नाशिक २०००) आणि डॉ.अनुपमा निरंजन उजगरे (मुंबई २००५) यांनी भूषविले आहे.
नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष सायमन मार्टिन यांचा आणि माझा परिचय अगदी अलिकडचा. काही महिन्यांपूर्वीचा.
मात्र साहित्यविश्वातील त्यांच्या कामगिरीबाबत फार आधीपासून मला माहिती आहे.
सायमन मार्टिन यांच्या निवडीमुळे नाशिकमधील नियोजित संमेलन मोठ्या उत्साहात होईल यात शंका नाही.
ख्रिस्ती साहित्य संमेलनांतील माझा सहभाग तसा मर्यादित राहिला आहे.
तिसेक वर्षांपूर्वी कवि निरंजन उजगरे यांच्या अध्यक्षतेखाली मालवण येथे झालेल्या आणि अशोक आंग्रे यांच्या अध्यक्षतेखाली नगर येथे २०१२ साली झालेल्या संमेलनास मी एक श्रोता म्हणून हजर होतो.
सातारा आणि नाशिक या दोन्ही साहित्य संमेलनांशी निगडीत असलेल्या बातम्या आणि घडामोडींकडे एक साहित्यप्रेमी म्हणून इतरांप्रमाणे माझेही लक्ष असणार आहे.
नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष सायमन मार्टिन यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा !

Camil Parkhe September 22, 2025

Monday, September 8, 2025

 


कॅथोलिक चर्चमध्ये `संत' हा सन्मान मिळण्याबाबत भारी कडक, किचकट, वेळकाढू नियम आणि प्रक्रिया आहेत.
तिथे संतपदाची पायरी गाठण्याची अनेक लोक दोनशे-तीनशे वर्षे वाट पाहत आहेत.
यापैकी अनेकांना त्याआधीच्या पायरीवर म्हणजे व्हेनरेबल (आदरणीय), बिऍटीफाईड (धन्यवादित) अशा पहिल्या आणि दुसर्या पायरीवरच कायमस्वरुपी समाधान मानावे लागणार आहे.
भारतात विविध ठिकाणी कार्य केलेल्या आणि संतपदाचा सन्मान मिळवण्याच्या प्रतीक्षा यादीत असलेल्या मिशनरींची संख्या फार मोठी आहे.
गोव्यातील फादर अग्नेलो डिसोझा, संगमनेरचे स्विस जेसुईट फादर फ्रान्सिस शुबिगर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातलया माळीघोगरगावचे फ्रेंच फ्रान्सलियन मिशनरी गुरियन जाकियरबाबा ही माझ्या माहितीतील काही नावे.
अर्थात संतपदाची ही प्रक्रिया अलीकडच्या काळात राबवली गेली आहे.
प्राचीन काळात येशू ख्रिस्ताच्या बारा शिष्यांपैकी अकरा जणांना आपोपाप संत मानले गेले. गालावर चुंबन घेऊन येशूचा विश्वासघात करणाऱ्या ज्युडास इस्किर्योतचा याला अपवाद.
येशूची आई मदर मेरीसुद्धा, त्यानंतर सेंट पॉल, आणि इतर सेंट ऑगस्टीन, सेंट थॉमस आक्वीनाससारखे धर्मपंडित संत बनवले गेले.
मध्ययुगात उदयास आलेल्या प्रोटेस्टंट पंथांत मात्र नव्याने संत बनवण्याची प्रक्रिया अजिबात नाही.
मात्र विविध सामाजिक क्षेत्रांत महत्त्वाचे योगदान असलेल्या व्यक्तींना कॅथोलिक चर्चचे संतपद मिळेलच असे नाही.
भारतात गोव्यात मिशनरी कार्य केलेल्या फ्रान्सिस झेव्हियर यांना संतपद मिळाले आहे.
मात्र सतराव्या शतकात मदुराईत आणि दक्षिण भारतात ख्रिस्ती धर्मप्रसार करणारे, ख्रिस्ती धर्मात विविध जातींना मागच्या दाराने प्रवेश देणारे आणि 'व्हाईट ब्राह्मण' म्हणून ओळखले जाणारे इटालियन मिशनरी रॉबर्ट डी नोबिली आणि गोव्यात `ख्रिस्तपुराण' हे मराठी महाकाव्य १६१६ साली रोमी लिपीत छापणारे ब्रिटिश जेसुईट फादर थॉमस स्टीफन्स हे संतपदापासून आजही वंचित राहिले आहेत.
कॅथोलिक चर्चमध्ये एखाद्या व्यक्तीला संत बनवण्याच्या प्रक्रियेत आधी त्या व्यक्तीचे जीवन, चारित्र्य यावर संशोधन केले जाते, त्यानंतरच संतपदाच्या प्रक्रिया सुरु करायची कि नाही याचा निर्णय घेतला जातो.
त्या मृत व्यक्तीच्या माध्यमातून किमान एकदोन चमत्कार झाले आहेत याची वैद्यकीय अहवालांनुसार शहानिशा केली जाते.
ज्यांना त्यांच्या हयातीत संत मानले गेले अशा मदर तेरेसांच्या संतपदाबाबतसुद्धा अशीच प्रक्रिया राबवली गेली होती
आजच्या युगात देव, धर्म आणि चमत्कार या गोष्टींवरचा लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे तरी कॅथोलिक चर्चच्या संतपदाच्या प्रक्रियेत चमत्काराला आजही स्थान आहे.
आपल्या श्रद्धा आणि कार्यामुळे तुरुंगांत हुतात्मे झालेल्या जगभरातील अनेक लोकांना कॅथोलिक चर्चने संतपदाचा सन्मान बहाल केला आहे.
ओडिशा राज्यात आदिवासी आणि कृष्टरोग्यांमध्ये कार्य करणारे ऑस्ट्रेलियन मिशनरी ग्रॅहम स्टेन्स आणि त्यांची दोन कोवळी मुले रात्री जीपमध्ये झोपलेली असता एका जमावाने त्यांना १९९९ साली जिवंत जाळले.
ग्रॅहॅम स्टेन्स जर कॅथोलिक मिशनरी असते तर संतपदाच्या प्रक्रियेसाठी ते हुतात्मा होण्यामुळे नक्कीच नैसर्गिकरित्या पात्र ठरले असते.
ग्रॅहॅम स्टेन्स हे प्रोटेस्टंट मिशनरी होते.
`अर्बन नक्सल' आणि `देशद्रोही कारवायां'च्या आरोपाखाली भीमा कोरेगाव एल्गार परिषद प्रकरणी मुंबई तुरुंगात असलेले वयोवृद्ध जेसुईट फादर स्टॅन स्वामी जामिनाची सुनावणी चालू असताना २०२१ साली मरण पावले.
झारखंडमधील आदिवासी लोकांमध्ये काम करणारे आणि आता `कॉम्रेड', `शहिद' म्हणून गणले जाणारे फादर स्टॅन स्वामी कॅथोलिक चर्चच्या संत प्रक्रियेसाठी भविष्यकाळात नक्कीच पात्र ठरु शकतात.
सतराव्या शतकात श्रीलंकेत मिशनरी कार्य करणार्या मूळचे गोव्यातले फादर जुझे किंवा जोसेफ वाझ यांना तीन शतकांनंतर पोप फ्रान्सिस यांनी २०१५ साली सिलोन येथे समारंभपूर्वक संतपदाचा सन्मान दिला.
संतपदाच्या प्रक्रियेबाबत `भारतरत्न' मदर तेरेसा अणि पोप जॉन पॉल दुसरे हे अपवाद अणि सर्वाधिक नशिबवान ठरले आहेत त्यांच्या मृत्यूनंतर अल्पावधीत अनेक नियम बाजूला सारुन चर्चने त्यांना संत म्हणून जाहीर केले.
संतपद प्रधान करण्याच्या या सोहोळ्याला `कॅननायझेशन (canonisation) असे म्हणतात.
पोप फ्रान्सिस यांनी २०१६ साली व्हॅटिकन सिटीत मदर तेरेसा यांना संत म्हणून जाहीर केले त्या खास विधीला भारताच्या तत्कालीन परदेश मंत्री सुषमा स्वराज भारतीय प्रतिनिधींसह खास निमंत्रित म्हणून उपस्थित होत्या.
अशीच एक संतपदाची प्रक्रिया आज रविवारी व्हॅटिकन सिटीत पार पडली आहे.
अवघे पंधरा वर्षांचे आयुर्मान लाभलेल्या कार्लो अकुटिस (Carlo Acutis) या मुलाला पोप लिओ यांनी सेंट पिटर्स बॅसिलिकातल्या झालेल्या खास विधीमध्ये संत म्हणून जाहीर केले आहे.
रविवारच्या या सोहळ्यात तरुणपणीच पोलिओने निधन झालेल्या इटालियन पियर जॉर्जियो फ्रासाती पियर जॉर्जियो फ्रासाती (१९०१–१९२५) यांनाही संतपदाचा बहुमान देण्यात आला.
`इंडियन एक्सप्रेस'च्या काल सात सप्टेंबरच्या अंकात कार्लो अकुटिस (३ मे १९९१ - १२ ऑकटोबर २००६) याच्या संतपदाबाबत पान दोनवर अँकरची बातमी होती.
लंडन येथे इटालियन कुटुंबात १९९१ साली कार्लो अकुटिस याचा जन्म झाला होता. त्याच्या जन्मानंतर त्याचे आईवडील अंतोनिया सालझानो आणि अँड्रयू अकुटिस मिलानला स्थलांतरित झाले होते.
कार्लो याला फुटबॉल, व्हिडिओ गेम्स आणि पाळीव प्राणी यांची आवड होती. धार्मिक कार्यासाठी तो इंटरनेटचा वापर करत असे.
कार्लो अकुटिस याने आपल्या स्थानिक चर्च किंवा पॅरिशसाठी आणि कॅथोलिक चर्चसाठी संकेतस्थळे विकसित केली होती. आपल्या डिजिटल कौशल्यांचा वापर करून कॅथोलिक शिकवणींचा या मुलाने ऑनलाइन प्रसार केला होता.
`गॉड्स इन्फ्ल्यूनसर' असे कार्लो अकुटिसचे वर्णन करण्यात आले आहे.

ल्यूकेमियामुळे २००६ साली निधन झालेला कार्लो अकुटिस हा आता मिलेनियल पिढीतला पहिला कॅथोलिक संत ठरला आहे.
कार्लो अकुटिस याच्या माध्यमातून दोन चमत्कार झाले आहेत असे कॅथोलिक चर्चने म्हटले आहे.
पोप फ्रान्सिस यांनी या मुलाच्या संतपदास मंजुरी दिली होती. पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर पोप लिओ यांनी संतपदाची ही प्रक्रिया आज रविवारी पूर्ण केली.
काल रविवारच्या कॅननायझेशन समारंभात एक ऐतिहासिक घटना घडली.
व्हॅटिकनच्या त्या प्रसिद्ध सेंट पिटर्स चौकात कॅथोलिक चर्चच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या कुटुंबातील सदस्याच्या संतपदाच्या समारंभाला त्याचे आईवडील, मिचेल आणि फ्रान्सेसा हे जुळे बहीणभाऊ असे संपूर्ण कुटुंब जातीने हजर राहून या अभिमानास्पद घटनेचे साक्षीदार ठरले आहे.
चर्चच्या इतिहासात केवळ दोनच आयांना आपल्या लेकरांना संत घोषित होताना प्रत्यक्ष पाहण्याचे भाग्य लाभले आहे.
याआधी १९५० साली मारिया गोरेत्ती यांना पोप बारावे पायस यांनी संतपदाचा सन्मान देण्यात आला तेव्हा त्या समारंभाला त्यांची आई असुंता कार्लिनी सेंट पिटर्स चौकात उपस्थित होत्या.
या मिस्साविधीमध्ये मिचेल या कार्लो अकुटिसच्या धाकट्या भावाने बायबलमधील एक उतारा असलेले पहिले वाचन वाचले.
कार्लो अकुटिसच्या निधनानंतर चार वर्षांनी त्याच्या या जुळ्या बहीणभावांचा जन्म झाला होता.
तरुण कॅथोलिकांसाठी जवळचा आणि समजण्यासारखा असे एक आधुनिक आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून व्हॅटिकन सिटीने कार्लो अकुटिसला म्हणून सादर केले आहे.
तरुण पिढीला चर्चकडे आकर्षित करण्यासाठी हे एक पाऊल आहे हे नक्की.

Camil Parkhe, September 8, 2025


Saturday, September 6, 2025


अरुंधती रॉय यांची `द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स' ही कादंबरी प्रकाशित होऊन आणि त्या पुस्तकाला बुकर पुरस्कार मिळून अनेक वर्षे झालीयेत. पण अजून ते पुस्तक मी वाचले नाही.

पुढे कधी ते वाचेल असेही वाटत नाही.
हे खूप विचित्र वर्तन असेल हे मला ठाऊक आहे. पण एखाद्या साहित्यिकाची मूळ कादंबऱ्या वाचण्याऐवजी त्या साहित्यिकावर लिहून आलेले लिखाण वाचण्याची मला अधिक हौस आहे.
कादंबऱ्या किंवा फिक्शन वाचणे मी खूप वर्षांपूर्वी बंद केले आहे.
अरुंधती रॉय यांचे नवे ताजे पुस्तक `मदर मेरी कम्स टू मी' हे पुस्तक काल केरळमध्ये कोची शहरात सेंट तेरेजा कॉलेजमध्ये भरगच्च गर्दीत प्रकाशित झाले.
मात्र त्याआधीच या भारतातील एक सर्वाधिक जगप्रसिद्ध असलेल्या लेखिकेच्या मुलाखती अनेक इंग्रजी दैनिकांत छापून आल्या आहेत, त्या मी उत्सुकतेने वाचल्या आहेत.
`मदर मेरी कम्स टू मी ' हे पुस्तक येशूची आई मदर मेरीवर नसून अरुंधती रॉय यांच्याच आई असलेल्या मेरी रॉय यांच्यावर आहे.
या मायलेकींचे आयुष्यभर कधीच जमले नाही, त्या तणावपूर्ण आणि प्रेमाच्या नातेसंबंधी या पुस्तकात अरुंधती रॉय यांनी लिहिले आहे.
प्रकाशनप्रसंगी आपल्या भाषणात अरुंधती रॉय हसतहसत म्हणाल्या : "ज्यांच्यावर मी सर्वाधिक प्रेम करते असे जवळपास सर्व लोक या सभागृहात जमले आहेत. आपल्या सरकारचा विचार करता, ही खूपच धोकादायक गोष्ट आहे..'
आपल्या नेहेमीच्या स्वभावानुसार रॉय यांनी लगेचच जगभरातील आणि देशातील दु:खद घटनांवर टिपण्णी केली. .
“आता मी मंचावर येण्याची तयारी करत असतानाच दिल्ली उच्च न्यायालयाने गेली पाच वर्षे तुरुंगात असलेल्या उमर खालिद आणि माझ्या अनेक मित्रांना पुन्हा एकदा जामीन नाकारला आहे,” असे त्या म्हणाल्या.
अरुंधती रॉय यांची ओळख करून देताना मल्याळम साहित्यिक के. आर. मीरा यांनी त्यांचे वास्तुविशारद, अभिनेत्री, पटकथालेखिका, कादंबरीकार, निबंधकार, कार्यकर्त्या असे वर्णन केले.
मात्र या वर्णनांत सर्वाधिक टाळ्या मिळाल्या त्या मीरा यांनी रॉय त्यांची “एक अधिकृत `अर्बन नक्सल' आणि व्यावसायिक देशद्रोह प्रेरक' अशी ओळख करून दिली तेव्हा.
“त्या भारतातील एकमेव लेखिका आहेत ज्यांच्या बोलण्याकडे जगातील सर्व फॅसिस्ट सरकारे लक्ष देत आहेत. त्या खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय भारतीय लेखिका आहेत,” असे मीरा यांनी अरुंधती रॉय यांचे वर्णन केले, असे `प्रिंट' वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
पुस्तक प्रकाशनाआधीच त्यांच्या पुस्तकांना मिळालेली प्रसिद्धी त्यांच्याबद्दल खूप काही सांगून जाते.
अर्थात रॉय यांच्या पुस्तकांची व्यावसायिक पद्धतीने मार्केटिंग केली जाते, यासाठी इतर अनेक लेखकांप्रमाणे त्यांचा स्वतःचाही एजंट आहेच.
याबाबत भारतीय किंवा मराठी प्रकाशन व्यवसाय खूप, खूप मागे आहे हे सांगायलाच नको.
अरुंधती रॉय यांच्या पुस्तकांना वाचकांचा मिळणारा प्रतिसाद प्रचंड आहे. `क्रॉस वर्ल्ड'च्या बुक गॅलरींत जगातील प्रसिद्ध लेखकांच्या फोटोमध्ये अरुंधती रॉय यांचाही हमखास समावेश असतो.

Camil Parkhe September 4, 2025



 

                                            मराठी वाड्मयाचा (गाळीव ) इतिहास पु. ल. देशपांडे

`वाट चुकलेला फकीर मशिदीत' असा एक वाक्प्रचार मराठीत पूर्वी प्रचलित होता. (आता नाही. असे खूप काही वाक्प्रचार, म्हणी, कव्वालीसारखी गाणी आपण आता हद्दपार केली आहेत).

तर त्या दिवशी शहरात मी असाच बिनकामी फिरत होतो आणि मग समोरच दिसलेल्या पुस्तक प्रदर्शनाकडे पाय ओढले गेले.
अर्ध्यापाऊण तासांच्या चाळणीनंतर दोन पुस्तके बॅगेत टाकली.
त्यापैकी एक अगदी छोटेसे पुस्तक होते पण शिर्षक आणि लेखकाचे नाव आकर्षक होते.
`मराठी वाड्मयाचा (गाळीव ) इतिहास', मात्र मुकेश माचकर लिखित `मराठी वाड्मयाचा (घोळीव) इतिहास' याच्याशी गफलत नको.
हे पुस्तक मूळ म्हणजे ओरिजिनल होते, लेखक पुरुषोत्तम लक्ष्मण अर्थात पु. ल. देशपांडे.
मुखपृष्ठ आणि आतील रेखाचित्रे वसंत सरवटे यांची ! .

ते ७६ पानांचे पुस्तक पूर्ण चाळले. मध्यवर्ती पानांवरचे एक उपशिर्षक वाचले आणि ते पुस्तक घेण्याचा लगेच निर्णय झाला.
पु. ल. देशपांडे आणि दुर्गा भागवत या दोघांचीही अनेक पुस्तके मी श्रीरामपूरला शाळेत असताना सत्तरच्या दशकात वाचली आहेत.
कारण हे दोन्ही साहित्यिक याच क्रमाने घोषित आणिबाणी पर्वात इचलकरंजी आणि कराड इथल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे लागोपाठ अध्यक्ष झाले होते.
अशाच प्रकारे वि. स. खांडेकरांना ज्ञानपीठ मिळाल्यानंतर नववी-दहावीला असताना मी `ययाती' कादंबरी वाचली होती.
त्यानंतर लगेचच श्रीरामपूर सोडून गोव्यात गेल्यावर तेथे इंग्रजी शिकून मी मराठी साहित्य वाचनाला काही काळापुरता रामराम ठोकला होता.
गोव्यातच इंग्रजी पत्रकारितेत आल्यावर पणजीला मी पु. ल. देशपांडेंची सलग तीन व्याख्याने ऐकली होती.
त्या भरगच्च सभागृहातला त्यांचा तो बोलण्याचा आणि प्रेक्षकांच्या हास्याचा धबधबा आजही कानावर कायम राहिला आहे.
पुलंना ऐकण्याचा तो माझा पहिला आणि शेवटचा प्रसंग.
मात्र श्रीरामपूर सोडल्यानंतर पुलंचे एकही पुस्तक मी वाचलेले नाही, त्यांच्यावर लिहिलेले मात्र सतत वाचत आलो आहे.
उदाहरणार्थ संजय मेणसे यांचे ` ब्राह्मणी मानसिकता आणि पु. ल. देशपांडे' हे सर्वांत अलीकडचे पुस्तक.
आणि तरीही पुलंचे हे पुस्तक मी फारसा विचार न करता बॅगेत टाकले, याची दोन कारणे होती.
मुकेश माचकर यांनी या पुस्तकाच्या धर्तीवर नवी साहित्यरचना केली होती, त्यामुळे या मूळ साहित्यकृतीबाबत माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती.
दुसरे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या पुस्तकात पुलंनी परदेशी ख्रिस्ती मिशनरींनीं मध्ययुगीन काळात गोव्यात निर्माण केलेल्या कोकणी आणि मराठी साहित्यकृतींबाबत आपल्या बोचऱ्या भाषेत भाष्य केले आहे.
`मराठी वाड्मयाचा (गाळीव ) इतिहास' हा लेख पु. ल. देशपांडे यांनी १९६७ सालच्या `मौज'च्या दिवाळी अंकात लिहिला होता.
प्राचीन मराठी वाड्मयाच्या इतिहासाचे पु. ल. देशपांडे यांनी आपल्या विडंबनशैलीत या पुस्तकात कथन केले आहे.
या पुस्तकात पु. ल. देशपांडे यांनी श्रीचक्रधर स्वामी यांच्यापासून नंतरचे अनेक संतकवी, पंतकवी, शाहीर वगैरेंविषयीसुद्धा आपल्या याच विनोदी, बोचऱ्या शैलीत लिहिले आहे.
संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, समर्थ रामदास वगैरेंबाबत या पुस्तकात पुलंनी विनोदी शैलीत लिहिले आहे.
याप्रमाणेच अर्वाचीन मराठी वाङमयाचेही विडंबन करण्याचा त्यांचा बेत होता. त्यासाठी आवश्यक ती वाड्मयेतिहासाची पुस्तकेसुद्धा देशपांडे यांनी मिळवली होती. हा दुसरा लेख `मौज'च्या १९६८ सालच्या दिवाळी अंकासाठी लिहिला जाणार होता.
या दोन्ही लेखांचे मिळून एक पुस्तक प्रकाशित करण्याचा संकल्प होता. दुसऱ्या लेखाचा हा बेत मात्र कधीच साकार झाला नाही. तो लेख होण्याची शक्यता धूसर झाल्याने मौज प्रकाशनाने पुलंच्या पंच्याहत्तरीनिमित्त १९९४ साली हा एकच लेख पुस्तकरुपाने पहिल्यांदा प्रकाशित केला होता.
मौज प्रकाशनाने हे पुस्तक १९९४ साली पहिल्यांदा प्रकाशित केले होते. या पुस्तकाचे २०२३ सालचे हे सतरावे पुनर्मुद्रण आहे.
पुलंनी हे लिखाण त्याकाळात लिहिले हे तसे बरेच झाले. नाहीतर सांप्रतच्या काळात त्यांची आणि रेखाचित्रकार वसंत सुरवटे यांची काही धडगत नसती.
घराकडे परतीच्या प्रवासात या लहानशा पुस्तकाचा बराचसा भाग वाचूनही झाला होता आणि पुलंच्या बाबतीत असलेला आदर दुणावला होता.
गोव्यातल्या मध्ययुगीन मराठी-कोकणी साहित्याची तसेच ख्रिस्ती धर्मातत्त्वांची पुलंना चांगली जाण होती हे या छोट्या लेखातून स्पष्ट होते.
या पुस्तकातील काही वाक्ये मी वानगीदाखल देत आहे.
कोकणी आणि गोव्यासंदर्भांत असल्याने `शितावरून भाताची परीक्षा' ही म्हण येथे सर्वार्थाने लागू होऊ शकेल.
``सोळाव्या शतकातील कवी, एकनाथ, सोनोपंत वगैरेंच्या ओव्याआख्याने वाचण्यात गुंतलेले पाहून हळूच काही ख्रिस्ती पादरी गोव्यात आले. ग्रंथांच्या आकारावरुन मराठीत पुस्तकांना बरा सेल आहे असे त्यांना वाटले आणि फादर स्टीफन्स नावाच्या फादराने `ख्रिस्तपुराण' मराठीत लिहिले.
फादर स्टीफन्सच्या ख्रिस्तपुराणाचा खरा हेतू गोवा हा महाराष्ट्राचा अविभाज्य घटक आहे हे सिद्ध करण्याचा होता. पण `अविभाज्य घटक' म्हळ्यार कितें रे सायबा? असे जो तो विचारु लागला.
'पुस्पामाजी मोगरी - परिमळामाजी कस्तुरी' वगैरे ऐकल्यावर '' खैचे कस्तुरे, फोंड्याचं कि म्हाड़डोळचं ग शणैनो ? आनी मांग्रे म्हळ्यार म्हापश्याचं व्हयहॉ?'' असे सवाल आले. त्यामुळे ख्रिस्तपुराणाचा दाखलवता गेला.
शिवाय `अविभाज्य घटक', कलापथके आणि मराठी साहित्य संमेलने यामुळे फादर स्टीफन्सचे ख्रिस्तपुराण महादेवशास्त्री जोशी यांनी टोपणनांवाने लिहिले आहे असा त्यांचा समज झाला.
``फादर स्टीफन्स मात्र चतुर होता. त्याने ख्रिस्तापेक्षाही मराठी भाषेची अधिक तारीफ करून फादरांविषयी आदर निर्माण केला.
या ख्रिस्तपुराणाचे वैशिष्ट्य असे : ते मराठीत असल्यामुळे ज्या गोंयकार ख्रिस्तांवासाठी होते ते लोक ते पुराण वाचीत नाहीत.
आणि मराठी लोक एकशे एकवीस ते एकशे पंचवीस या पाच ओव्या वाचून, ``भासांमधे मानू थोर / मराठीयेसी // इतके वाचल्यावर पुराण मिटतात.
`फादर स्टीफन्सनंतर संपूर्ण ख्रिस्तपुराण फक्त अ. का. प्रियोळकर यांनीच वाचले आहे असे आम्हांस खात्रीलायक कळते. ''
कोकणीचे व्याकरण रचणाऱ्या फादर गास्पार द मायगेल यांच्याबाबत पुलंनी लिहिले आहे:
```मराठी-कोकणी वादाचे आपणच आद्य जनक किंवा `ओरिजिनल फादर' म्हणून बरेच लोक आपला अग्रहक्क सांगतात. पण तो मान भौ मानेस्त फादर गास्पार द मायगेल यांचा आहे.
गास्पार द मायगेल ह्या फादरला कोकणीचा फार अभिमान. त्या ताणात त्याने कोकणीचे व्याकरण लिहिले, त्यामुळे ''अँ ! हॅ कित्य रेSS '' म्हणून बरेचसे गोंयकार क्रिस्तांव परत हिंदू झाले. ‘’
काही जुने साहित्य या ना त्या निमित्ताने पुन्हापुन्हा वर येत राहते. आपले महत्त्व अधोरेखित करत राहते.
पुलंचे हे छोटेखानी पुस्तक असेच.
Camil Parkhe September 3, 2025



https://www.esakal.com/blog/wandering-fakir-finds-his-way-into-the-masjid-marathi-vadmayacha-galiv-itihas-book-pjp78